इंदापूर टोल नाक्यावर शेकडोजण अडकले ः पुणे जिल्ह्याची सीमा पार करता येईना
रेडा -मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून इंदापूर तालुक्याच्या इतिहासाला मोठे महत्त्व आहे. असे असले तरी याच इंदापूर तालुक्यातून कर्नाटक व मराठवाड्यात पुणे मुंबईकडून निघाल्यानंतर जाता येते संपूर्ण लॉकडाऊन झाल्यामुळे व संचारबंदी लागू केल्यामुळे शेकडो परप्रांतीय इंदापूर नजीकच्या सरडेवाडी टोल नाक्यावर अडकून पडले आहेत ना जेवण, नाही पाणी, नाही सावली अशा बिकट अवस्थेत आम्हाला घरी जाऊ द्या, असा टाहो हे नागरिक फोडत आहेत.
संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने शहरे, गावे बंद झाली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. ज्यांची मोलमजुरी करून हातावरची पोट आहेत त्या लोकांची खरी परवड सुरू झाली आहे.
अनेक राज्यातून मुंबई-पुणे या शहरांमध्ये रोजीरोटीसाठी आलेल्या परप्रांतीयांना आता उपासमारीचा सामना करावा लागत आहे.21 दिवस संचारबंदी लागू केल्यानंतर या हातावरच्या पोट असणाऱ्या कामगारांना आपल्या गावाकडे जाताना रस्त्यातच अडवण्यात आले आहे.
पुणे व मुंबई येथून मजल-दरमजल करत आलेल्या या परप्रांतीय नागरिकांना टोल नाक्यावर स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर या नागरिकांना कर्नाटक सरकार लगेच ताब्यात घेणार नाही, अशीही माहिती हाती आली आहे.
मात्र या लोकांनी करायचे तरी काय म्हणून पशुसंवर्धन दुग्धविकास व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून संबंधित लोकांना घरापर्यंत जाण्यासाठी मदत करा असा आग्रह धरलेला दिसतो.
सुमारे 500 ते 700हून अधिक कामगार यामध्ये लहान बालके, महिला, वृद्ध, तरुण अडकून पडले आहेत. इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्याजवळ सोलापूर जिल्ह्याने प्रवेश नाकारल्याने सीमेवरतीच हे नागरिक रस्त्यावर बसून आहेत.
त्यांच्याजवळ पाण्याची, खाण्याची, राहण्याची सोय नाहीं यांना कोणी आपल्या परिसरात बसू देखील देत नाहीत. खरेतर परप्रांतीय असोत की गाववाले, मानवतेच्या दृष्टिकोनातून या लोकांकडे पाहण्याची भूमिका करोना या दुर्धर आजारामुळे दूषित झालेली दिसते.
मात्र पोलीस यंत्रणेकडून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू केला आहे. त्यामुळे या नागरिकांना घरापर्यंत पोहोचता येईल, असा विश्वास निर्माण झालेला दिसतो आहे.
शासन स्तरावरून मदतीची अपेक्षा
इंदापूर शहरातील व तालुक्यातील जनता ही संस्कृती, संस्कार पाळणारी असल्यामुळे व संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा याच मार्गाने श्रीक्षेत्र पंढरीला जात असल्यामुळे अन्नदान करण्याचा मानस नागरिकांचा सततचा असतो. म्हणून नागरिक या लोकांना पाणी, अन्न पुरवताना दिसताहेत. असे असले तरी शासन स्तरावरून या लोकांना जाऊ द्या घरी, यासाठी आदेश निघणे गरजेचे आहे