एमपीएससी उत्तीर्ण झालेल्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पुणे – “जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा’, “गणपती बाप्पा मोरया यंदाच्या वर्षी नियुक्ती लवकर होऊ द्या’ अशी घोषणाबाजी करीत उमेदवारांनी नियुक्तीच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने भावी अधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी लोटांगण घालून भीक मांगो आंदोलन केले.
एमपीएससीतर्फे स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा 2019 मधील गट अ आणि गट ब (राजपत्रित) संवर्गातील पदांसाठी 1 हजार 143 उमेदवारांची निवड झाली. मात्र, या परीक्षेच्या प्रक्रियेत चार वर्षांचा वेळ गेला, तसेच निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने सरकारच्या लालफितीच्या कारभाराविरोधात उमेदवार रस्त्यावर उतरले.
सरकारी कारभारामुळे दिरंगाईमुळे स्वप्नील लोणकर या आमच्या मित्राला आत्महत्या करावी लागली. आणखी किती उमेदवारांनी आत्महत्या करण्याची सरकार वाट पाहात आहे, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला. तातडीने नियुक्ती मिळण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन तातडीने नियुक्ती दिली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही उमेदवारांनी दिला.