प्रवेशाचे वेळापत्रक विस्कळण्याची शक्यता
पुणे – वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 25 टक्के राखीव कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापूर्वी आरटीई (राइट टू एज्युकेशन) प्रवेशासाठी शाळांना नोंदणी करणे अनिवार्य आहे. शाळा नोंदणीसाठी गुरुवारी शेवटचा दिवस होता. सायंकाळपर्यंत अजूनही 125 शाळांनी मुदतीत नोंदणी केली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार समाजातील आर्थिक व दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. राखीव कोट्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळतो. त्यामुळे आरटीई प्रवेशाकडे पालकांचे लक्ष लागले आहे. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दि. 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही सर्व प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शाळांची शिक्षण विभागाकडे नोंदणी होणे आवश्यक आहे.
पुण्यात आरटीई प्रवेशासाठी एकूण 983 शाळांनी नोंदणी होणे अनिवार्य आहे. शाळा नोंदणीसाठी 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी असा कालावधी होता. शाळा नोंदणी आणखी रात्री 12 वाजेपर्यंत वेळ आहे. सायंकाळपर्यंत 983 पैकी 857 शाळांनी नोंदणी केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
125 शाळांनी फिरविली पाठ…
शाळा नोंदणीसाठी अजूनही 125 शाळांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. नोंदणीसाठी अजूनही काही शाळांकडून निरूत्साह असल्याचे स्पष्ट होत आहे. आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून वेळेत मिळत नसल्याच्या कारणावरून काही शाळा नोंदणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दिलेल्या वेळेत शाळा नोंदणी झाली तरच पुढच्या प्रवेशप्रक्रिया वेळापत्रकानुसार होणे शक्य आहे. परंतु, उर्वरित सर्व शाळा गुरुवारी रात्रीपर्यंत नोंदणी करतील, अशी अपेक्षा प्राथमिक शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे.