पुणे -करोनामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या. मात्र, अजूनही करोनाचे संकट गेले नसून, तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे आतापासूनच पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ई-लर्निंगद्वारे’ विद्यार्थ्यांना धडे देण्यास सुरुवात केली आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऍपद्वारे अभ्यासक्रम शिकवला जात असल्याने शाळेसह आता घरातही त्यांना धडे गिरविणे शक्य झाले आहे. जिल्ह्यातील 52 हजारांहून अधिक विद्यार्थी ई-लर्निंग’द्वारे स्मार्ट शिक्षण घेत आहेत.
जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ई-स्कूल ऍपचा वापर सध्या सुरू आहे. प्रायोगिक तत्वावर ही उपाययोजना असून, त्यानंतर पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग केला जाणार आहे. जिल्ह्यातील सहावी ते आठवीपर्यंतच्या 52 हजार 124 विद्यार्थ्यांकडून ऍपचा वापर सुरू आहे. ऍपद्वारे लॉग इन करणे, कोणत्याही शिक्षकाला परीक्षेचे पेपर अपलोड करणे, पेपर घेणे, तसेच विद्यार्थ्यांना शिकविता येईल. विद्यार्थ्यांना लेखी उत्तरपत्रिका अपलोड करता येईल.
सध्या पालकांसह शिक्षकांच्या फोनमध्ये ऍप देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. केद्र, राज्य सरकार, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण संस्था (एससीआरटी) यांच्याकडून प्रमाणित झालेले अभ्यासक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) मदतीने ऍपमध्ये घेण्यात आले आहेत.
या ऍपमुळे खासगी क्लासेस, संस्थांच्या शिक्षणपद्धतीच्या धर्तीवरच आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंग पद्धतीने शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. डाएट संस्थेच्या माध्यमातून किती विद्यार्थी शिकले, किती विद्यार्थ्यांना ज्ञान अवगत झाले, आणखी किती विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज आहे, याचाही आढावा घेता येणार आहे, असेही आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.