15 फेब्रुवारीपासून ई-फॉर्म जारी होणार
पुणे – भारत सरकारने गेल्या पाच वर्षांपासून उद्योग सुलभतेसाठी पूरक वातावरण निर्मिती करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्याची दखल जागतिक बॅंकेने घेतली आहे. आता दि. 15 फेब्रुवारीपासून सरकार नव्या उद्योगांना नोंदणी सुलभ व्हावी, याकरिता ई-फॉर्म उपलब्ध करणार आहे.
या ई- फॉर्ममध्ये सर्व बाबींचा अंगभूत समावेश असेल. हा फॉर्म 15 फेब्रुवारीपासून उपलब्ध करण्यात येणार आहे. नोंदणी झाल्याबरोबर लगेच ईपीएफओ आणि इएसआयसीची नोंदणी होणार आहे. कंपनी व्यवहार मंत्रालय हे काम करणार असून या फॉर्मला एसपीआयसी प्लस असे संबोधण्यात घेणार आहे. यातून दहा प्रकारच्या सरकारी सेवा उपलब्ध होणार असून यामुळे कंपनी सुरू करणाऱ्याचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
या नोंदणीबरोबरच कंपनीचे नाव राखीव ठेवले जाईल व इतर नोंदी केल्या जातील. याशिवाय या फोनच्या माध्यमातून कंपनीचा पॅन, बॅंक खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. डीआयएन आणि गरज पडल्यास जीएसटीआयएन क्रमांकही उपलब्ध केला जाईल. देशात सध्या 11 लाख 50 हजार कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांच्या माहितीचे डिजिटायझेशन करण्याचे हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे.
महाराष्ट्रात व्यवसाय कराची नोंदणीही होणार
या ई फॉर्मच्या माध्यमातून कामगार मंत्रालय, महसूल विभाग त्याचबरोबर महाराष्ट्रही काही सेवा उपलब्ध करणार आहे. 15 फेब्रुवारीपासून ज्या नव्या कंपन्या नोंदल्या जातील, त्यांना ईपीएफओ आणि इएसआयसी नोंदणी बंधनकारक होणार आहे. या फॉर्मबरोबर ती नोंदणी करता येऊ शकेल. त्यासंबंधात महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नव्या कंपनीची नोंदणी करायची असल्यास व्यवसाय करासाठी ही नोंदणी करावी लागणार आहे.