नवी दिल्ली – देशातील बिहार आणि प. बंगाल यांच्यासह पाच राज्यातील 45 टक्के महिलाच घरगुती स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
हे सर्वेक्षण देशातील 17 राज्ये आणि पाच केंद्र शासित प्रदेशात करण्यात आले होते. त्यात आसाम (42.1 टक्के), बिहार (42.1 टक्के), नागालॅंड (43 टक्के), प. बंगाल (40.2 टक्के) आणि मेघालय (33.7 टक्के) यांचा समावेश आहे.
लोकसंख्या, आरोग्य, कुटुंब नियोजन आणि आहारा संबंधित निर्देशांकासाठी सुमारे सहा लाखांहून अधिक नमुन्यांची पाहणी करण्यात आली. स्वच्छ इंधनाचा वापरामध्ये गोवा (96.5 टक्के), तेलंगणा (91.8 टक्के), मिझोराम (83.8 टक्के), आंध्र प्रदेश (83.6 टक्के) या राज्यांचा समावेश आहे. वीज, एलपीजी किंवा नैसर्गिक गॅस अथवा बायोगॅस यांचा स्वच्छ इंधनामध्ये समावेश होतो.
16 राज्यातील 70 टक्के कुटुंबांच्या मलनि:सारणाच्या व्यवस्थेत सुधारणा झाली आहे. त्यात लक्षद्वीप ( 99.8टक्के) आणि केरळ (98.7 टक्के) ही राज्ये आघाडीवर आहेत. लडाख (42.3 टक्के) आणि बिहार (42.3 टक्के) ही मागास राज्ये आहेत.
सर्वेक्षणात माहिती घेतलेली सर्व कुटुंबे आयोडाईज्ड मीठ वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 90 टक्के घरांत वीज पोहोचली होती तर 70 टक्के कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्यात सुधारणा झाल्याचेही समोर आले आहे.