सविंदणे (वार्ताहर): शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबटयाची दहशत कायम असून काही दिवसांपुर्वी सविंदणे येथे दहा बोकडांना ठार मारले होते. आता कवठे येमाईच्या मुंजाळवाडी येथील भगवान शंकर हिलाळ यांची घोडी बिबट्याने हल्ला केल्याने ठार केल्याची घटना घडली आहे.
मागील दोन तीन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचे वावर असून दिवसासुद्धा बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. या परिसरात मानवी वस्ती, जनावरे यांचे वास्तव्य असल्याने बिबट्याची दहशत पाहता वनविभागाने तत्परतेने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस, बाजरी ही पिके आहेत. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी पुरेशी जागा निर्माण झाली आहे. सध्या सविंदणे, कवठे परिसरात बाजरी काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकाम करताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसे कर यांनी केले आहे. तर वनविभागास या घटनेची माहिती देतातच वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. नागरिकांची या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी लक्षात घेता आजच पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपाल चारुशीला काटे व वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी सांगितले.