पाथर्डी -पाथर्डी तालुक्यात तीन मुलांना ठार करून नरभक्षक बिबट्याने वन विभागासह सर्वांची झोप उडवली आहे. या बिबट्यास पकडण्यासाठी विविध जिल्ह्यांतील पथके पाथर्डीत दाखल झाली आहेत. मात्र या पथकांना मागील दोन दिवसांपासून या बिबट्याने गुंगारा दिला आहे. तसेच त्यांच्या नाकावर टिच्चून परिसरातील गावांत दोन कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतील भीती कायम आहे.
सध्या वनअधिकारी-कर्मचारी आहोरात्र बिबट्याचा शोध घेत आहेत.आम्हाला झोप नाही… अन् सापडतही नाही. ग्रामस्थ म्हणतात बिबट्याच्या दहशतीने झोप नाही. झोप तर सर्वांचीच उडाली आहे. मग बिबट्या गेला कुठे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज सकाळी शिरसाटवाडी तलावाजवळ रक्तबंबाळ झालेली दोन कुत्री मृतावस्थेत आढळली. मानेला चावा घेतल्याने मृत्यू झालेली कुत्री बिबट्याने ठार केली, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यावर हल्ला करणारा प्राणी तरस असावा, असा निष्कर्ष काढून वन विभागाने सर्च मोहीम थंड केली.
बिबट्या नरभक्षक झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, तर अन्य प्राणी खाणारा बिबट्या नसून, तरस असावा असे स्थानिक वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तीन बालकांचा मृत्यू होवूनही तरस अचानक सक्रिय झाल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
पिंजरे, कॅमेरे, ड्रोन, सर्च ऑपरेशन, तज्ज्ञ अशा विविध शब्द प्रयोगातून मोहिमेची माहिती मिळते. पिंजरे किती, याचा निश्चित आकडा समोर येत नाही. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी आकडेमोड होत आहे. मिळत असलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून येत असल्याने नेमके चालले तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील मढी, केळवंडी, करडवाडी येथे तीन बालकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी दिवसासुद्धा शेतात जाण्यास भीत आहेत. थंडीत अचानक वाढ झाल्याने सर्च ऑपरेशन सुद्धा विस्कळीत झाले आहे. वनविभागाने राज्याच्या विविध भागांतून सुमारे शंभर अधिकारी, तज्ज्ञ कर्मचारी, वाहनांचा ताफा, शस्त्रे, साधनसामग्री, असा सर्व फौजफाटा शोध मोहिमेसाठी तैनात केला आहे. जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी सध्या तालुक्यात तळ ठोकून आहेत. ऑपरेशन बिबट्या मोहिमेतील विस्कळीतपणा अजूनही न संपल्याने बिबट्या तीन दिवसांत हाती लागला नाही.
शोध मोहीम योग्य पद्धतीने सुरू नसून महामार्गाने वाहने पळवून बिबट्या कसा हाती लागेल, असा प्रश्न शिरसाटवाडीचे कार्यकर्ते भाऊसाहेब शिरसाठ यांनी विचारून कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातील वनमित्र व तालुक्यातील सर्पमित्र संघटनांच्या सदस्यांचा शोध मोहिमेत सक्रिय सहभाग आहे. गावाबाहेर निर्जन व दुर्गम भागातील वस्तीवर राहणाऱ्या काही गावांतील ग्रामस्थांना वनविभागाने संकटकाळी वाजवण्यासाठी फटाके दिले आहेत. ग्रामस्थ व प्रशासनाला चकवा देण्याएवढा बिबट्या चतुर झाला की शोध पथके योग्य दिशेने शोध घेत नाहीत, याबाबत लोकांमध्ये संभ्रम वाढत आहे. सायंकाळनंतर प्रत्येक गावातच नव्हे तर शहरातही विविध उपनगरांमध्ये बिबट्याच्या दहशतीने आपोआप लॉकडाऊन होते. सायंकाळनंतर शक्यतो कोणी घराबाहेर पडत नाही. तीन ते चार दिवसांच्या अंतराने बिबट्या हल्ला करतो, असे अनुभव पाहता डोंगराळ भागातील विविध गावांतील लोकांची चिंता अधिकच वाढली आहे.
भक्ष्य खरेदीसाठीही नाहीत पैसे
औरंगाबाद व पुणे येथील पथके आज तपास कार्यात सहभागी होवून विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्याची संख्या वाढवण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली. शोध मोहिमेसाठी वनविभागाकडे निधीची कमतरता जाणवून गावपातळीवर पिंजऱ्यांत ठेवण्यासाठी भक्ष्य विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. जनतेच्या मनातील भीती कमी करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचारी तरसाने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करून संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.