जामखेड : तालुक्यातील नायगाव येथे गेल्या 8 दिवसांपासून बिबट्याच्या संचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 8 दिवसांत बिबट्याने 3 वासरे 3 शेळ्या व 2 म्हशीचे रेडकू हल्ल्यात जखमी झाले आहेत. यापैकी 2 शेळ्या व 1वासराचा मृत्यू झाला आहे.
नायगाव जवळच्या परीसरात( बांधखडक) वावर वाढला असून बिबट्याने वनरावर हल्ला करून ठार मारले आहे त्यामुळे शेतक-यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लावलेल्या सापळ्याकडे न फिरकता बीबट्याचा जवळच्या परीसरात वावर वाढल्याने बांधखडक भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जामखेड तालुक्यातील नायगाव येथील परीसरात गेल्या 8 दिवसांपासून बिबट्या शेतातील वस्त्यांवर वावरताना काही लोकांना दिसत होता पण गावातील इतर लोकांचा विश्वास बसत नव्हता. तो तरस असावा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. जेव्हा 3 वासरे, 2 म्हशीचे पिल्ले व 3 शेळ्या यावर बिबट्याने हल्ला केला यापैकी 2 शेळ्या, 1 वासरू व 1 म्हशीचे पिल्लू मृत्यूमुखी पडले तेव्हा शिवसेना तालुका उपप्रमुख गणेश उगले व शिवसेना युवा नेते शरद उगले यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व बिबट्या विषयी माहिती दिली. तेव्हा दि ११ रोजी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावात दाखल झाले व ठश्यांचा अभ्यास केला तेव्हा हे ठसे बिबट्याचेच असल्याचे त्यांनी सांगितले व मृत शेळ्या व वासरांचा पंचनामा केला व नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.
त्यानंतर श्रीरामपूर येथुन पिंजरा मागवून नायगाव परिसरात लावण्यात आला मात्र पिंजर्याकडे बिबट्या फिरकलाच नसुन जवळील बांधखडक भागात बिबट्याने वनरावर हल्ला करून त्याला ठार मारले आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर बांधखडक भागात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बांधखडक भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान कर्जत वनक्षेत्रपाल गणेश छबिलवाड यांनी वनविभागाचे सात जणांचे पथक तयार केले आहे.