मंचर (प्रतिनिधी) – टाकेवाडी (ता. आंबेगाव) येथे गेल्या आठ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या आणि दोन वासरे ठार झाली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावावा, अशी मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त
केली आहे.
दोन दिवसांपूर्वी टाकेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय चिखले यांच्या शेळीवर तर सोपान बिबवे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. दोन्ही शेतकऱ्यांचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती उपसरपंच अनिल चिखले आणि पोलीसपाटील उल्हास चिखले यांनी वनविभागाला कळविली.
चिखलेमळा येथे बिबट्याचे नेहमीच दर्शन होत असून रविवारी (दि. 21) बिबट्याने पहाटे चिखले यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून ठार केले. गोठ्यात आवाज झाल्याने चिखले व घरातील सदस्य बाहेर आले असता बिबट्या पळून गेला होता. तेथे बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. याबाबत वनअधिकारी बी. एम. साबळे, के. के. दाभाडे, पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.