पुणे – मार्केटयार्डात केवळ फळ बाजारातच लिंबू विक्री करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. केवळ चार आडत्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. यास शेतकऱ्यांसह काही आडत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे चांगलाच वाद होण्याची शक्यता आहे.
फळबाजारात लिंबाच्या घाऊक व्यापाऱ्यांनी तरकारी विभागात होणाऱ्या लिंबाच्या विक्रीबाबत तक्रार केली होती. त्यावर बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी लिंबाच्या आडत्यांबरोबर बैठक घेऊन यापुढे लिंबाची विक्री केवळ फळविभागात करण्याचा निर्णय घेत तशा सूचना प्रशासनाला दिल्या. त्याबरोबर ज्या त्या विभागात संबंधित शेतमालाची विक्री करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र, या निर्णयास आता विरोध होऊ लागला आहे. याबाबत आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, लिंबू विक्रीच्या निर्णयाबाबत आडते असोसिएशनला कोणतीही कल्पना नाही. याबाबत प्रशासकांशी चर्चा केली जाईल.
तरकारी विभागातील आडते विलास निलंगे म्हणाले, लिंबाला जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी तरकारी विभागात लिंबू विक्रीस पाठवितात. बाजारात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत.
याबाबत नगर जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकरी दादासाहेब धुमाळ म्हणाले, मार्केटयार्डात यापुर्वी फळविभागात लिंबे विक्रीस पाठवित होतो. तिथे कोणत्याही आडत्याकडे लिंबाना ठरलेला एकच भाव मिळायचा. मात्र, तरकारी विभागात लिंबू विक्रीस पाठविल्यानंतर तेथे गोणीमागे 100 ते 150 रूपयांचा जास्त भाव मिळतोय. फळबाजारात लिंबू विक्रीत आमचे नुकसान होत आहे. सरकारने शेतकऱ्यांना कोठेही शेतमाल विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे आम्हाला बाजारात कोणत्याही विभागात लिंबू विक्रीस परवानगी दिली पाहिजे.