मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या एका वाक्याने सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे,
आमदार रवी राणा यांनी,”शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पराभूत होणार असे म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असते मात्र रवी राणा यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रवी राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, “राज्यसभा निवडणुकीत संजय पवारांना जी मतं मिळाली, ती फक्त एकनाथ शिंदे यांच्या मेहनतीमुळे मिळाली आहेत. पण आज एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्याप्रकारे विधान परिषद निवडणुकीची मांडणी केली आहे. ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पडणार आहे. गेल्या ५६ वर्षात जे घडलं नाही, असा धक्का शिवसेनेला विधान परिषदेत बसणार आहे. तसेच भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
विधान परिषदेत मी भाजपाला मतदान करू नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर दबाव टाकत आहेत, असा आरोपही राणा यांनी केला आहे. त्यासाठी ठाकरे यांनी मुंबई आणि अमरावतीचे पोलीस आपल्या घरी पाठवले होते. पण मी घरी नसल्याने पोलीस मला अटक करू शकले नाहीत, असे देखील रवी राणा यांनी यावेळी म्हटले आहे.