मुंबई: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बासला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर भाजपाचे पाच उमेदवार निवडून आले. या निवडणुकीमुळे महाविकास आघाडीची मते फुटल्यानंतर आता काँग्रेसचे नेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काँग्रेसची काही मतं फुटल्याचे मान्य केले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. याविषयी पहिली प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी,“आमची प्रथम क्रमांकाची मतं होती ती आम्हाला दिसत नाहीयेत. म्हणजे आमचीच मतं बाजूला गेली आहेत. कुठे गेली? कशी गेली हा विषय वेगळा आहे. विधिमंडळ काँग्रेसचा नेता या नात्याने मी ही जबाबदारी स्वीकारतो. मी ही भावना दिल्लीला कळवणार आहे. याशिवाय पक्ष म्हणून आम्हाला विचार करावा लागेल. तसेच महाविकास आघाडी म्हणून आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करुन काय दुरुस्ती केली पाहिजे याच्यावर विचार कारावा लागेल,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
तसेच, जवळपास २० ते २१ महाविकास आघाडीची मतं फुटली आहे. त्यामुळे सरकार अस्थिर होईल का? असे विचारल्यावर तशी शक्यता नाही असे स्पष्टीकरण थोरात यांनी दिले. “सरकारला धोका निर्माण होईल असे मला वाटत नाही. एकमेकांना दोष देण्यापेक्षा हे दोष आमचे- आमचे आहेत. ते दुरुस्त केले पाहिजेत. काँग्रेस म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. शिवसेनेनेही काळजी घेतली. मात्र हे कसं झालं हे मी आज लगेच काही सांगू शकत नाही,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.