मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तासंघार्षात सर्वोच्च न्यायालयाकडून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कृती अयोग्य ठरवली जावू शकते, असे भाष्य कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले आहे.
सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालावर प्रतिक्रिया देताना उज्ज्वल निकम म्हणाले, एका वेगळ्या निरपेक्ष दृष्टीकोनातून विचार केल्यास सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका वेगवेगळ्या कृतीवर आधारित आहेत. ही वेगवेगळी कृती असली तरी यातील मूळ कृती अशी आहे की, राज्यपालांनी जेव्हा विशेष सत्र बोलवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर या सर्व घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे यावर वेगवेगळा निर्णय येईल का? याबाबत मला वाटतं की, यामध्ये प्रामुख्याने दोन बाबी महत्त्वपूर्ण आहेत. विशेष सत्र बोलवण्याची राज्यपालांची कृती आणि त्यानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार 10 व्या परिशिष्टानुसार विधीमंडळाच्या अध्यक्षाला आहे. तसेच राज्यपालांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी जे काही तोंडी भाष्य केले, त्यावरून असे दिसते की राज्यपालांची कृती अयोग्य होती. अशाप्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकते. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी जे तोंडी मत व्यक्त केले होते, त्यावरून एक अंदाज लावता येतो. हा केवळ अंदाज आहे, असाच निर्णय लागेल, असे काही नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.