मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील जनता अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने करोना विषाणुविरुद्ध लढत आहेत. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे. सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी जनतेला शिस्त पाळण्याचे आणि सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले. हा विषाणु कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा. संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
राज्यात गुढीपाडवा, रामनवमी, पंढरपूरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले. ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धमिछयांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत. पण एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे. कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही. तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत, ठाकरे यांनी स्पष्ट केले. करोना विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी बजावले.
दिल्लीहून परतलेल्या लोकांचे विलगीकरण
परवा पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दिल्लीतील कार्यक्रम करून घरी परतलेल्या लोकांची माहिती देणारी यादी दररोज केंद्र सरकार आपल्याला पाठवत आहे. आतापर्यंत कळवलेल्या जवळपास 100 टक्के लोकांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याचे काम आपण केले आहे. परंतु जर यातील कुणी शोधायचे राहिले असतील तर त्यांनी स्वत:हून पुढे यावे. चाचणी करून घेऊन उपचार करून घ्यावेत, किंवा शेजारच्या नागरिकांनी अशा लोकांची माहिती द्यावी, असे आवाहन केले.