पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्या पक्षावरील दबाव आणखी वाढवला आहे. भाजपने पणजी मतदारसंघात चांगला उमेदवार दिल्यास निवडणूक रिंगणातून माघार घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
उत्पल यांना विधानसभा निवडणुकीसाठी पणजीतून भाजपची उमेदवारी हवी होती. मात्र, त्या पक्षाने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी शुक्रवारी भाजपला रामराम ठोकला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. त्यांचे बंड भाजपची डोकेदुखी वाढवणारे आहे.
आपल्या निर्णयामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या उत्पल यांनी शनिवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय खूप अवघड होता. तशाप्रकारचा निर्णय घ्यावा लागणार नाही असेच मला वाटत होते. त्या निर्णयाचा मला फार आनंद नाही. मात्र, काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे त्यांनी म्हटले. मनोहर पर्रीकर यांनी अनेक वर्षे गोवा विधानसभेत पणजीचे प्रतिनिधित्व केले.