व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट
जामखेड – करोना व्हायरसमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले असून पालेभाज्या, चिकन, मटणाच्या भावातही सरासरी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी टोमॅटो 20 रुपये किलो होते. आता 30 रुपये झाले आहेत.
मेथी, शेपू, चुका, पालक पाच रुपयांना जुडी मिळत होती. आता दहा रुपये जुडी झाली आहे. 30 रुपये पावशेर मिळणारा लसूण आता 40 रुपये झाला आहे. भेंडी आणि कोबीच्या भावात दुप्पट वाढ झाली आहे. 10 रुपये पावशेरने मिळणाऱ्या गवार शेंगा आता 20 रुपयांनी विकल्या जात आहेत. कोबीचेही भाव जवळपास असेच आहेत.
बकरा मटण, चिकन आणि अंड्यांचेही भाव वाढले आहेत. मटण 560 रुपये किलो होते, आता 600 रुपये किलोने विकले जात आहे. करोनामुळे चिकन आणि अंड्यांच्या किमती घसरल्या होत्या. पण, दोन दिवसांमध्ये यात वाढ झाली आहे. चिकन 60 ते 70 रुपये किलोने मिळत होते, आता ते 160 रुपये झाले आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी केलेल्या कृत्रिम टंचाईमुळे नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.