संदीप मांडवे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वडूज – माण-खटावमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसाने ओढ दिली असून खटाव तालुक्यात 75 टक्के पेरण्या झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उरमोडी धरणात साठ टक्के पाणीसाठा असून उपलब्ध पाणीसाठ्यातून एक आवर्तन माण- खटावला कॅनॉलद्वारे सोडण्यात यावे असे निवेदन खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, पेरणी झालेल्या गावांमध्ये कांदा, बटाटा, वाटाणा, ऊस यासारखी प्रमुख भांडवली पिके घेतली आहेत.
या पिकांवरच खटाव- माणच्या शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट अवलंबून असते. पावसाने ओढ दिल्यामुळे पिण्याबरोबर पिकांनाही पाण्याची खूप आवश्यकता आहे. अजून आठ दिवस पाण्याचे काही नियोजन झाले नाही तर शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे व खरीप वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर उरमोडीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.