नवी दिल्ली : काश्मीरमध्ये राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडित पुन्हा एकदा घाबरले आहेत. दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्यास सांगितले आहे. खोऱ्यात दहशतवाद्यांकडून हिंदूंच्या सातत्याने होणाऱ्या हत्यांनंतर काश्मिरी पंडितांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्याचेही भाजपचे म्हणणे आहे.
जम्मू आणि काश्मीर भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, काश्मिरी पंडित कार्यकर्त्यांनी खोरे सोडल्यास हे एक “भयानक पाऊल” असेल.
१२ मे रोजी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील तहसील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी महसूल अधिकारी राहुल भट्ट यांची हत्या केली होती. राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी त्यांच्या सुरक्षेसाठी निदर्शने केली. या निदर्शनांदरम्यान सरकारविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. आंदोलन करणाऱ्या काश्मिरी पंडितांवर बळाचा वापर केल्याची टीका भाजपने केली आहे.
दरम्यान राहुल भट्टच्या हत्येनंतर काश्मीर पंडित कर्मचारी घाबरले आहेत. ते त्यांच्या सुरक्षिततेची मागणी करत आहेत. दरम्यान, खोऱ्यात काम करणाऱ्या काश्मीर पंडित कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचीही मागणी होत आहे. काश्मिरी पंडित कर्मचारीही त्यांना काश्मीरबाहेर पोस्ट करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.