बारामतीकरांची आर्त हाक : पुन्हा 25 जणांना चावा
बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.शहरातील कसबा भागात शुक्रवारी (दि. 13) पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 25 पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेतला. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यापासून बारामती शहरात कुत्र्यांचा थरार सुरू असून नागरिकांनी निवडून दिलेले नगरसेवक गट-तटाच्या राजकाराण मश्गुल असल्याने आता दाद तरी कोणाकडे मागावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे गट-तट सोडा व कुत्र्यांना आवारा अशी आर्तहाक नागरिकांनी दिली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. नगरपालिका प्रशासन याबाबत उदासीन असून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरले आहे. 5 नोव्हेंबर नंतर अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत पुन्हा पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. 5 नोव्हेंबर रोजी पिसाळलेल्या कुत्र्यांनी विद्यार्थी, नागरीकांना चावा घेतला होता. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्यांनी वयस्कर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसह अनेकांचा चावा घेतला होता. यावेळी चावा घेतलेल्या दिपाली जाधव या विवाहितेचा 20 दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि. 13) पुन्हा कसबा, विठ्ठल प्लाझा, झारी गल्ली, मारवाड पेठ, भाजी मंडई, मळद पूल, लक्ष्मीनारायण नगर भागात पिसाळलेल्या काळ्या रंगाच्या कुत्र्याने नागरिकांना चावा घेतला.
महेश नारंग हे दुचाकीवर जात असतान कुत्र्याने झेप घेवून त्यांच्या पायाला चावा घेतला. दिवसा ढवळ्या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर उपचारासाठी सिल्व्हर ज्युबाली हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव यांनी तातडीने भेट देत नागरिकांची विचारपूस केली. तसेच तातडीने उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या.
कुत्रे पकडो मोहीम अयशस्वी!
बारामती शहरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बारामती नगर पालिकेकडे तक्रारी देखील केल्या आहेत. शहरातील अनेक भागत चौकात ही भटकी कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. याबाबत बारामतीकरांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम देखील हाती घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज घडलेल्या घटनेने नगर परिषदेची मोहीम अयशस्वी ठरल्याची चर्चा रंगली आहे.
यांना घेतला चावा
नबीलाला शेख, चेतन जगताप, सुमीत रणशिंग, महेश नारंग, शकुर बागवान, चैतन्य पवार, इब्राहिम, मुस्तकीम कुरेशी, जावेद कुरेशी, संदीप अडागळे, इकबाल तांबोळी, विशाल यादव, अजय माने, अमोल शिंदे, बाळू मोरे, दिनेश पवार, शेख शमशुद्दीन, श्रीकांत भोसले आदी नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.