मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवलेंनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारेंवर खोचक शब्दात टीका केली आहे. आठवले यांनी, “सुषमा अंधारे आधी माझ्या पक्षातही होत्या, पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत उपनेतेपद दिलं आहे,” असे म्हणत टोला लगावला.
सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविषयी रामदास आठवले, “शिवसेनेनं सुषमा अंधारेंना टीका करण्यासाठीच आणलं आहे. अंधारे आमच्याही पक्षात होत्या, पण आता त्या शिवसेनेत गेल्या आहेत. त्या तशा फरड्या, संघर्षशील वक्त्या आहेत. त्या काही वर्षे माझ्या पक्षात होत्या, पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिलं आहे.” असे यावेळी म्हणाले.
सीमावादावर बोलताना रामदास आठवले यांनी, “मराठी भाषिकांना महाराष्ट्रात घ्यावं ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होईलच, पण अलीकडे महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळत आहे. कुणी कर्नाटकमध्ये, कुणी तेलंगणामध्ये, तर कुणी आम्हाला गुजरातमध्ये जायचं असल्याचं म्हणत आहेत.” तसेच “ही परिस्थिती महाराष्ट्रासाठी फारशी भूषणावह नाही. या सीमावर्ती लोकांकडे अनेक वर्ष लक्ष दिलं गेलं नाही. त्यांना प्यायला पाणी मिळत नाही. यापूर्वीच्या सरकारनं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही,” असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
“असं असलं तरी शिंदे फडणवीस सरकारनं या भागासाठी २ हजार कोटींची घोषणा केली आहे. म्हैसाळ योजनेतून या गावांना पाणी मिळणार असून या भागाचा विकास होणं महत्त्वाचं आहे. या लोकांना इंडस्ट्री, शेती आणि पिण्यासाठी पाणी, रोजगार देणं गरजेचं आहे, या गावांकडे सरकारनं विशेष लक्ष द्यावं, अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे. कुठल्याही गावानं हतबल होऊन राज्य सोडून जाऊ नये, याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे,” असे मतदेखील रामदास आठवलेंनी व्यक्त यावेळी व्यक्त केले.