नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना दहशतवादी संघटनेने धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा’, असे धमकी वजा पत्र लष्कर-ए-इस्लाम नावाच्या दहशतवादी संघटनेने पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवासांपूर्वीच राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर आता या धमकीमुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना धमकी दिली आहे. स्थलांतरित कॉलनीच्या अध्यक्षांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘सर्व स्थलांतरित आणि आरएसएस एजंट यांनी काश्मिर सोडून जावे, अन्यथा मरायला तयार व्हा. काश्मीरमध्ये आणखी एक इस्त्राईल करून काश्मिरी मुस्लिमांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमची सुरक्षा दुप्पट, तिप्पट केली, तरीही तुम्ही मरणार’ अशी धमकी देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच एका दहशतवादी संघटनेने राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडून हत्या केली होती. राहुल सरकारी कार्यालयात काम करत होता. आणि दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयातच घसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
राहुल यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडित आक्रमक झाले होते. रस्त्यावर उतरत काश्मिरी पंडितांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. तसेच काश्मीरमध्ये पंडित सुरक्षित नसल्याचा आरोपही लावला होता. दरम्यन, आता पुन्हा एकदा या धमकीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.