संगमनेर -“नफरत छोडो भारत जोडो या घोषणेने शेगाव येथे झालेल्या विराट सभेत भाषणाची सुरुवात करणारे भारत जोडो अभियानाचे समन्वयक विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे राज्यभरातून भारत जोडो यात्रेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आ. थोरात यांच्याकडे राज्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी होती. त्यांनी मागील दोन महिन्यांपासून या यात्रेची पूर्वतयारीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रातून 382 किलोमीटरच्या प्रवासात विविध ठिकाणचे रस्ते, मुक्कामाची तयारी, दुपारी विश्रांती व जेवणाचे नियोजन, सभेचे नियोजन, यामध्ये सहभागी होणाऱ्या विविध संघटना, पक्ष या सर्वांना निमंत्रण, भारत जोडो यात्रेतील कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, सहभागी होणाऱ्या सर्वांची व्यवस्था, सुरक्षा, वैद्यकीय व्यवस्था अशी जबाबदारी आ. थोरात यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
दि. 7 रोजी नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे यात्रेचे आगमन झाले. त्यानंतर नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यांतून 382 किलोमीटरचा प्रवास या यात्रेने केला. या काळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात, तर आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेगाव येथे विराट सभा झाली. यात्रेत राष्ट्रवादी,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, मेघा पाटकर, समाजवादी पक्ष आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.