नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली खेळी कशी उभारायची हे कर्णधार विराट कोहली याच्याकडून शिका, असा सल्ला माजी कसोटीपटू व धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने नवोदित सलामीवीर इशान किशन व यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांना दिला आहे.
खेळपट्टीवर ठाण मांडून खेळी कशी उभारावी व सामना कसा जिंकून द्यावा, हे या दोघांनी कोहलीकडून शिकावे. क्रिकेटचे कोणतेही स्वरूप असो, जर कोहलीचा दिवस असेल तर तो सामना संपवूनच परत येतो. इशान आणि रिषभ यांनी कोहलीच्या खेळातून शिकले पाहिजे. खेळपट्टीवर स्थिरावल्यावर आनावश्यक फटकेबाजी करत आपली विकेट न गमावता अखेरच्या चेंडूपर्यंत टीकून राहिले पाहिजे, असेही सेहवाग म्हणाला.
माझ्या कारकिर्दीच्या सुरूवातीला मलाही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही असाच सल्ला देत होता. सचिन मला सांगायचा, उद्या काय होणार हे आपल्याला माहीत नसते. म्हणून खूप धावा करून नाबाद परत या. पुढच्या सामन्यात आपण धावा करण्यास सक्षम असाल की नाही हे आपल्याला माहीत नसते. परंतू आज आपल्याला चेंडू फुटबॉलप्रमाणे दिसत असल्याने आपण चांगले खेळत असतो, असे सेहवागने सांगितले.