मुंबई – बारसू रिफायनरी प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते (शिवसेना) रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या सभेत बारसू रिफायनरी दौऱ्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. तसेच शरद पवार यांच्याकडून काही तरी शिकण्याचा सल्ला दिला.
“महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन वेळाच विधानसभेत गेले ही माहिती शरद पवार यांनी माध्यमांवर सांगितली आहे. त्यामुळे ज्यांना बाप म्हणताय तर त्यांच्याकडून काही तरी शिका. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा म्हणजे फक्त गद्दार- गद्दार म्हणण्यासाठी असून याला जनता भीक घालणार नाही,” असे रामदास कदम म्हणाले.
बारसुला रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच प्रस्ताव पाठवला आणि आता बारसुला जाऊन लोकांना भडकवायचं काम देखील उद्धव ठाकरे करणार आहेत. ठाकरे यांचा हा दुतोंडीपणा सर्वांना माहिती असल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे.
यावेळी रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. “उद्धव ठाकरे यांचा मुलगा व बाळासाहेब ठाकरे यांचा नातू एवढीच आदित्य ठाकरे यांची ओळख आहे. त्यापलीकडे त्यांची कोणतीच ओळख नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची टीका करण्याची औकात नाही,” असेही रामदास कदम यांनी सुनावले.