नवी दिल्ली – रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताला मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचासाठी आणि इतर बाबीसाठी परकीय चलन मोजावे लागत आहे. त्या तुलनेत परकीय चलनाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा कमी होऊन 600 अब्ज डॉलरपर्यंत गेला आहे.
22 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा तीन अब्ज डॉलरने कमी होऊन 600 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा 311 दशलक्ष डॉलरनी कमी झाला होता. परकीय चलनसाठा उच्च पातळीवर ठेवण्यासाठी आणि रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार व अर्थ मंत्रालयाकडून योग्य प्रमाणात प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जाते.
सध्या असलेला परकीय चलन साठा साधारणपणे 13 महिन्याच्या आयातीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे भारताला या आघाडीवर जास्त चिंता करण्याची गरज नाही. मात्र आयातीची गरज भागत असली तरी भारताकडील परकीय चलन साठ्यात घट झाल्यानंतर रुपयाचे मूल्य कमी होते. त्याचा भारतातील महागाई वाढण्यावर परिणाम होत असतो.
त्यामुळे शक्य तितक्या लवकर निर्यात वाढवून भारताकडील परकीय चलन साठा वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी वेळोवेळी सांगितले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या रिझर्व बॅंकेने व्याजदरात पाव टक्के वाढ केली आहे. त्याचबरोबर आगामी एक वर्षामध्ये एक ते दीड टक्का वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अशा अवस्थेमध्ये शेअर आणि रोखे बाजारातील परकीय गुंतवणूक वेगाने भारतातून परत जात आहे.
ही अडचण असतानाच रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे जागतिक बाजारात भारत आयात करीत असलेल्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारताला जास्त डॉलर देऊन आयात करावी लागत असल्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यामध्ये घट होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.