पिंपरी – गेल्या आर्थिक तिमाहीत आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक ऍट्रीशन रेट दिसून आला. ऍट्रीशेन रेट अर्थात कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या. इतकी वर्ष कंपनी कर्मचाऱ्यांना बेंचवर बसवायची किंवा राजीनामा देण्यास भाग पाडत होती. परंतु गेल्या आर्थिक तिमाहीमध्ये चित्र अचानक पलटले आहे.
नामांकित बड्या कंपन्यांचा ऍट्रीशन रेट हा 10 ते 30 टक्क्यांदरम्यान जाऊन पोहचला आहे. याचा परिणाम कंपन्यांसोबत सध्या कार्यरत असलेल्या आयटीयन्सवरही होत आहे. कमी झालेल्या मनुष्यबळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.
आयटीयन्स स्वतःच नोकरी बदलत आहेत किंवा नोकरी सोडत आहेत. स्थानिक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा काम सोडून जाण्याचा दर पहिल्यांदाच इतका वाढला असल्याचे दिसून येत आहे. अचानकच कामाचा प्रवाह वाढला असून कंपन्यांना अतिरिक्त कशुल मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे.
अनेक कंपन्यांनी आपण हजारो नवीन रोजगार देणार असल्याच्या घोषणा देखील केल्या. दुसरीकडे मात्र कंपन्यांमध्ये आयटीयन्स मात्र नोकरी बदलण्याचे किंवा स्टार्टअपमध्ये भविष्य घडविण्याचे प्रयत्न करत आहेत.
अनेक भारतीय कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या बनून जगभरात पोहचल्या आहेत. तसेच बाहेरील कंपन्यांनीही भारतात आपली कार्यालये उघडली आहेत. भारतीय बहुराष्ट्रीय आयटी कंपन्या जगभरातील इतर उद्योगांसाठी सॉफ्टवेयर बनविणे किंवा त्यांचे वेगवेगळे प्रकल्प सांभाळणे अशी कामे करतात. याच प्रकारची कामे विदेशी कंपन्याही करतात.
भारतीय आयटीयन्सने दाखविलेली चुणूक आणि आर्थिक गणिते यामुळे अनेक विदेशी कंपन्यांनी भारतात आपली कार्यालये स्थापन करुन व्यवसाय सुरू केला आहे. या कंपन्यांना कॅप्टिओ असेही म्हटले जाते.
या कंपन्यांची भारतातीतल पायाभूत गुंतवणूक भारतीय कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे. भारतीय कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चरचे भाडे आपल्या परदेशातील क्लाइंट कंपन्यांकडून घेत असतात. त्यामुळे त्यांची प्रोजेक्ट कॉस्ट वाढते. दुसरीकडे कॅप्टिओ कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच नियमित ठेवत ही कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
अचानक आली तेजी
करोनानंतर आयटी क्षेत्रातील अनेकांच्या नोकऱ्या जातील, अशी भाकिते वर्तविली जात होती. परंतु याउलट अचानकच या क्षेत्रात तेजी आल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर जगभरातील उद्योग-व्यवसायांनी नव्याने आर्थिक नियोजन करू लागले. नुकसान भरुन काढण्यासाठी सर्वच क्षेत्रातील अनेक विदेशी कंपन्यांनी कॉस्ट सेव्हिंगवर भर दिला. विकसित देशांमध्ये लेबर कॉस्ट खूप अधिक असल्याने आणि कामगार कायदे कडक असल्यामुळे बहुतेक कंपन्यांनी आपली कामे भारतातील आयटी कंपन्यांकडे आऊटसोर्स करण्यास भर दिला.
चेंज ऑफ पॉवर
आयटी कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज भासत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पगार वाढवून देत आहेत. दुसरीकडे अनेक आयटीयन्स सुद्धा वर्क फ्रॉम होममध्ये रुळले आहेत आणि त्यांच्याकडे आता पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होमची सुविधा देणाऱ्या कंपन्यांनाच अनेक आयटीयन्स प्राधान्य देत आहेत. सध्या अनेक आयटीयन्स दिवसभरात दोन ते तीन इंटरव्यू ऑनलाइन देत आहेत. पूर्वी कंपनीच्या अटी-शर्तींवर काम करणारे कर्मचारी आता तुम्ही वर्क फ्रॉम होमची सुविधा देणार का? असा प्रश्न इंटरव्यूमध्ये विचारत आहेत.
करोनाकाळानंतर आयटी क्षेत्रात वाढलेले काम आणि कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने आयटीयन्सला आता चांगली पगारवाढ आणि अपेक्षेनुसार सुविधा मिळत आहे. पर्यायाने ते मोठ्या प्रमाणात नोकऱ्या बदलत आहेत. तसेच अनेकजण स्टॉर्टअपकडे वळले आहेत. यामुळे नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर आहे. त्यात सर्वांत मोठा फॅक्टर हा पगार आणि वर्क फ्रॉम होम हा आहे.
– हरप्रीत सलुजा, अध्यक्ष, नॅसेन्ट इन्फोर्मेशन
टेक्नोलॉजी एम्प्लाइज सिनेट