सुरेश डुबल
वर्षानुवर्षे खुर्च्या उबवणारे नेते बाजूला; दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी
कराड – सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षगळती सुरू आहे. आपल्या पक्षातील नेते, पदाधिकारी गेल्यामुळे काहींना वाईट वाटत असेल. मात्र, वर्षानुवर्षे फक्त सतरंज्या उचलण्याऱ्या सच्चा कार्यकर्त्यांना आता महत्त्व येणार आहे. सतरंज्या उचलण्याचे दिवस आता संपले आहेत. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते पहिल्या फळीत येऊ लागले असून वर्षानुवर्षे खुर्च्या उबवणारे नेते बाजूला झाले आहेत. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
सतरंज्या उचलण्याचे दिवस संपले…!
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सत्तेत नसणाऱ्या पक्षांना गळती लागली आहे. काहीही करून आपण भाजप-शिवसेनेत जाऊन निवडून आल्यास आपल्याला मंत्रिपद मिळेल, या आशेवर अव्वल फळीतील नेते, पदाधिकारी इकडून तिकडे उड्या मारत आहेत. मात्र, आपला पक्ष वाढला पाहिजे, सत्ता मिळायला पाहिजे, त्यातून आपल्या मतदारसंघाचा, राज्याचा विकास होईल, यासाठी नेत्यांची आज्ञा शिरसावंद मानून प्रामाणिकपणे काम करण्यास दुसरी फळी नेहमी तत्पर असते.
सकाळ झाली की पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा. नेत्यांच्या सभांना हजेरी लावायची. पडेल ती कामे करायची. पक्षासाठी वाहून घ्यायचे, यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कधीही आपण मोठे व्हावे, असे वाटले नाही. पक्ष महत्त्वाचा मानून त्यासाठी आपले आयुष्य वाहणारे कार्यकर्ते प्रत्येक पक्षात असतात. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते पक्ष सोडून जात असल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना डिमांड आहे. आयुष्यभर सतरंज्या उचलणारे, पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणारे कार्यकर्ते येत्या काळात पदाधिकारी, नेते होणार, असे वातावरण आहे.
राजकारणात कोणी कुणाचं नसतं. जो तो आपला स्वार्थ साधतो. असे असले तरी कधी काळी राजकारणात पक्षनिष्ठा महत्त्वाची मानली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांत पक्षनिष्ठा मागे पडून तिची जागा स्वार्थाने घेतली आहे. आपल्या मतदारसंघातील कामे मार्गी लावायची आहेत, हे कारण सांगून अनेक नेते सोयीची भूमिका घेत आहे. मग, कोणी भाजपमध्ये तर कोणी शिवसेनेत जात आहे. त्यांच्या मूळ पक्षांची वाताहत सुरू आहे, पण ती थांबवण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
एवढी वर्षे आपल्याला पक्षाने भरभरून दिले, याचे त्यांना काहीच कसे वाटत नाही, हा प्रश्न जनतेला पडत आहे. असे असले तरी पक्षादेशाचा आदर करणारे प्रामाणिक कार्यकर्तेदेखील आहेत. “सब्र का फल मीठा होता है’, याचा प्रत्यय आता त्यांना येऊ लागला आहे. पहिल्या फळीतील नेते पक्षातून गेले नसते तर सतरंज्या उचलणे, बॅनर चिकटवणे, झेंडे लावणे, टोप्या-मफलर वाटणे, हीच कामे या कार्यकर्त्यांना करायला लागली असती. तसे पहायला गेले तर हे आताही सुरू राहील; परंतु आता राजकीय वजन वाढलेल्या या कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे.
सत्ता असलेला पक्ष हवा
राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सलग पंधरा वर्षे सत्ता होती. त्या कालावधीत तेच ते आमदार, तेच ते मंत्री होते. एखाददुसरा अपवाद वगळता नवीन चेहरे दिसत नव्हते. सत्ता जाताच यातील बरेच नेते, पदाधिकाऱ्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. अडचणीच्या काळात पक्षाला साथ द्यायची सोडून ते सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामुळे त्यांना पक्षनिष्ठेपेक्षा सत्तेची हाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे.