कोल्हापूर – इडी ची कारवाई ही राजकीय दृष्ट्यान प्रेरित झालेली कारवाई आहे. ईडीकडे मी पाच वर्षांपासून कारवाईसाठी फेऱ्या मारतोय, पण कारवाई केली नाही. आता राजकीय दबाव आणण्यासाठी हेतुपूर्वक कारवाई केली जातेय असा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.
दरम्यान एका साखर कारखान्यावर नाही तर राज्यातील 43 साखर कारखान्यावर कारवाई झाली पाहिजे, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकलाय असा आरोपही त्यांनी केलाय. ते कोल्हापूरात बोलत होते.
राजू शेट्टी शेट्टी म्हणाले, सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकलाय. ईडीकडे ५ वर्षे फेऱ्या मारल्या. ४३ कारखान्यांची यादी हवी तर पुन्हा देतो. ईडी ही राजकीय दृष्ट्या काम करत आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले.
पाच वर्षांपूर्वी पुरावे दिले होते. आता ही कारवाई करण्याचा अर्थ ईडीला कोणीतरी सांगतोय, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतोय, म्हणून त्याचा काटा काढायचाय, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
सहकारी होते तेव्हा हे कारखाने तोट्यात होते, खासगी झाल्यावर ते फाय़द्याच चालू लागले आहे. याचा अर्थ काहीतरी गौडबंगाल आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी साखर कारखाने विकत घेतले आहेत. सर्व कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.