मुंबई : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद नुकताच मिटला होता. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी सातत्याने टीका केली आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या टीकेला आता खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देताना थेट उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना ‘आळशी माणूस ऑफ द इयर’ म्हटलं आहे. दरम्यान, राणा यांच्या टीकेमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेसंदर्भात नवनीत राणा यांना विचारणा केली असता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. आपण सुषमा अंधारेंना ओळखत नसल्याचेही नवनीत राणा यांनी यावेळी म्हटले. “एकतर मी त्यांना ओळखत नाही. ज्या पद्धतीने त्या टीका करत आहेत, ज्या पद्धतीने त्या अभिनय करत आहेत, ज्या पद्धतीने त्या मॅडम बोलत आहेत.. त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मग देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात आळशी माणूस म्हटलं. मला नवल वाटतंय. त्यांना जर आळशी माणूस शोधायचाय, तर ‘मातोश्री’मध्ये जाऊन शोधावा. तो आळशी माणूस त्यांना तिथे भेटेल”, असे नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
“आळशी माणूस ऑफ द इयर’ कुणाला शोधायचा असेल, तर त्यांना त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांना शोधता येईल. उद्धव ठाकरे जेवढे संपूर्ण ५६ वर्षांत फिरले नसतील, तेवढे या तीन महिन्यांत फिरले असतील. त्यामुळे आळशी माणूस जर कुणाला शोधायचा असेल, तर त्यांनी मातोश्रीवर जाऊन शोधून घेतला पाहिजे”, असा सल्ला देखील यावेळी राणा यांनी सुषमा अंधारे यांना दिला आहे.
दरम्यान, पती रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांना वाद मिटवून शांततेचा सल्ला आपण दिल्याचं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. “जनतेची जबाबदारी आमच्यावर आहे. ती पार पाडण्यासाठी दिल्ली असो किंवा अजून कुठे असो, तिथे मी जाणार. कालही दोन्ही आमदारांना तोच संदेश मी दिला की दोघांनी शांतता ठेवली पाहिजे. सगळ्यांना सोबत येऊन कामाला सुरुवात केली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सामान्य लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत. मला वाटतं सगळ्यांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.