पुणे – करोना संसर्गाचा धोका अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर वकिलांनी काही काळजी घेतली पाहिजे, याविषयी दैनिक “प्रभात’कडे कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया…
पक्षकारांची निष्कारण गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. बऱ्याच वेळा केस एकाची असते. मात्र, त्याच्यासोबत मित्र परिवार, नातेवाईक येतात. या पार्श्वभूमीवर कारण नसताना पक्षकाराने येऊ नये. गरज असल्यास एकट्यानेच यावे. त्याच्यासोबत इतरांनी येऊ नये, याबाबत पक्षकारांना समजावणे. सर्दी, ताप आणि खोकला आणि घसादुखी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वत:हून न्यायालयात येऊ नये. प्रॅक्टिसमधील स्वरूपही बदलले पाहिजे. अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. थोडक्यात बाजू मांडणे गरजेचे आहे.
– ऍड. डॉ. चिन्मय भोसले, उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील
वकिलांनी स्वत:ची काळजी घ्यावी. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सोशल डिस्टंन्सिग पाळले पाहिजे. मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. सॅनिटायझर वापरले पाहिजे. विनाकारण गर्दी करायची नाही. वकिलांनीही काम उरकून लगेच बाहेर जावे, जेणेकरून गर्दी कमी होईल. कमी लोक न्यायालयात कशी येतील, याबाबत काळजी घेतली पाहिजे. एका कामासाठी एका वकिलानेच न्यायालयात यावे. प्रशासनाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन करावे.
– ऍड. के. टी. आरू, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन