तहसील कार्यालयात सैनिक माजी सैनिकांचे कामे होणार प्राधान्याने
जामखेड: माजी सैनिक,शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकानी देशासाठी प्राणाची बाजी लावून देशाची सेवा केली आहे व करत आहेत. त्यांची सेवा आणि समर्पण विचारात घेता सर्व सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्याचा उचित सन्मान करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिक यांचे विविध विभागाकडील शासकीय कामे जलद गतीने व प्राधान्याने निर्गत करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात “अमृत जवान सन्मान अभियान २०२२” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . सदर अभियानाची सुरवात आज तहसील कार्यालय जामखेड येथे प्रांत अधिकारी कर्जत जामखेड डॉ अजित थोरबोले आणि सर्व विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्जत जामखेड उपविभागीय अधिकारी डॉ अजित थोरबोले , तहसीलदार योगेश चंन्द्रे,गटविककास अधिकारी प्रकाश पोळ मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सुपेकर ,महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे उपअभियंता योगेश कासलीवाल साहेब,माजी सैनिक संघटनेचे प्रमुख शहाजी डोके साहेब,प्रहार कल्याण संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना तहसीलदार योगेश चंद्रे यांनी अभियानाबाबत माहिती देताना सांगितले की, सदर अभियान हे दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ पासून दिनांक २३ एप्रिल २०२२ या ७५ दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर १ समिती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बनविण्यात आली आहे. समिती बैठक आठवड्याला घेण्यात येणार असून त्यामध्ये प्राप्त झालेल्या मागणी च्या अनुषंगाने कार्यवाहीचा आढावा घेतला जाणारा आहे.
यामध्ये प्रत्येक महिन्याचा ३ र्या सोमवारी “अमृत जवान सन्मान दिवस” आयोजित करून सर्व विभाग प्रमुख व सैनिक अर्जदार यांच्या उपस्थितीत आढावा घेतला जाणारा आहे .तसेच सदर अभियानाच्या कालावधीत प्रश्नाच्या निरसन करण्यासाठी विशेष मेळावे घेतले जाणार आहे. हे अभियान योग्य पद्धतीने राबविले जाण्यासाठी तालुकास्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे आर्ज स्वीकृती केली जाणार आहे. तसेच याचे समन्वय करणेसाठी नायब तहसीलदार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यक्रम शुभारंभ करतेवेळी शाहिद झालेल्या जवान यांच्या विरपत्नी आणि वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी जवान लक्ष्मण भोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते,गटविककास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मनोगत आणि मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देढे सर यांनी केले तर आभार नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी केले.