भाजप प्रवेशावरून खा. उदयनराजेंचा इशारा
गणेशोत्सवात डॉल्बी वाजलीच पाहिजे
सातारा – खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला ना. चंद्रकांत पाटील खोडा घालत असल्याच्या चर्चांवर उदयनराजेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला कोणीही खो घालू शकत नाही, खो घातला तर मीच घालू शकतो आणि कोणी खो घालण्याच्या विचारातही राहू नये, असा इशारा खा. उदयनराजेंनी ना. चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी वाजलीच पाहिजे, अशीदेखील प्रतिक्रिया उदयनराजेंनी यावेळी दिली.
साताऱ्यात पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर उदयनराजेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, मी कायम सकारात्मक विचार करत असतो, कधीच नकारात्मक विचार करत नाही. लोकांचे हित जोपासले गेले पाहिजे, अशी कायम भावना ठेवली आहे. मात्र, मी आजपर्यंत ज्या ज्या योजना आणल्या. त्याकडे माजी मुख्यमंत्र्यांनी साधे पाहिले देखील नाही. अशा रिकाम्या लोकांबरोबर राहिलो तर भविष्यात लोकच माझ्यासोबत राहणार नाहीत. तेव्हा बघू भविष्यात कुठल्या पक्षात जायचे की नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले.
गणेशोत्सवात डॉल्बी वाजविण्याबाबत उदयनराजे म्हणाले, आज बेरोजगारी वाढत आहे. अशावेळी चार लोकांनी एकत्र येवून व कर्ज काढून डॉल्बी विकत घेतल्या. मात्र, डॉल्बीवर बंदी आणून त्या लोकांना बेरोजगार करण्याचे काम होत आहे. वास्तविक डॉल्बी वाजली तर असे काय होणार आहे? मागे साताऱ्यात डॉल्बीमुळे जुनी इमारत पडल्याचे निमित्त झाले. खरे तर डॉल्बी एवढी भयानक असेल तर सर्जिकल स्ट्राईकसाठी विमानांच्या ऐवजी डॉल्बीच वापरली असती. त्याचबरोबर जे नाशिक ढोल वाजतात त्यांचे आवाज देखील डॉल्बीप्रमाणेच असतात. तेव्हा गणेशोत्सवात उत्साह वाढण्यासाठी डॉल्बी हवीच, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी व्यक्त केली.