कापूरहोळ – गणेशोत्सव, जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण, महाबळेश्वर, गोवा आदी ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची पुणे-सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळपासून गर्दी झाली होती. टोल नका तसेच खड्ड्यांमुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या सुमारे तीन-चार किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे चालक तसेच एसटी, ट्रॅव्हल बसमधून प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले होते.
कोणतेही वाहन तीन मनिटांपेक्षा अधिक वेळ टोलनाक्यावर थांबवू नये, असा नियम असताना टोल प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर शनिवारी (दि.31) सकाळी 7:00 पासूनच वाहनांची मोठी गर्दी वाढू लागली.
पुण्याच्या बाजूने सुमारे तीन ते चार किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. टोल नाका ते कोंढणपूर फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली, वाहने कासव गतीने पुढे सरकत होती. वेळू येथील उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणे बाजूकडे सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.