शासकीय कारभाराचा भरोसा नाही
पळसदेव – उजनीत शासनाकडून दरवर्षी मस्त्यबीज सोडणे आवश्यक आहे. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून ज्या प्रमाणात मस्त्यबीज सोडणे आवश्य आहे त्या प्रमाणात ते सोडले जात नसल्याचे वास्तव आहे. शासनाच्या कामाचा भरोसा नसल्याने रोजी-रोटीचा विचार करून पळसदेव भागातील मच्छिमारांनी स्वतःच वर्गणी काढून उजनीत कटला जातीचे 30 हजार मस्त्यबीज सोडले आहे. केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता आपली जबाबदारी मानून आम्ही स्वतःच मस्त्यबीज सोडल्याचे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले.
उजनी धरणात पाणी प्रदूषणामुळे लहान मासे मरण पावले आहेत, त्यामुळे उजनीतील मासेमारी धोक्यात आली आहे. जलाशयात मासे मिळेनासे झाले आहेत. शासकीय पातळीवर मस्त्यबीज सोडण्याचे प्रमाणात अत्यंत कमी आहे, याच कारणातून उजनीत मासे मिळणे अवघड झाले आहे. शिवाय उजनी काठावर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मच्छिमारांनी मोठ्या प्रमाणात लहान मस्त्यबीजांची मासेमारी केल्याने माशांचे प्रमाण कमी झाले आहे.
दरवर्षी नियमित व योग्य प्रमाणात मस्त्यबीज सोडल्यास उजनीत मासे कमी होणार नाहीत व माशांचे प्रमाण वाढल्यास प्रदूषित पाण्यावर नियंत्रण आणण्यास मदत होईल. उजनीत माशांचे प्रमाण कमी झाल्याने पाणी प्रदूषणही मोठ्या वाढत आहे. याचा इतर जलचरांवर विपरीत परिणाम होत आहे. याच बाबी लक्षात घेत अखेर पळसेदव परिसरातील मच्छिमारांनी एकत्र येत वर्गणी काढून कटला जातीचे मत्स्यबीज उजनी धरणात सोडले आहे. यावेळी माणिक नगरे, दत्त नगरे, अजिनाथ भोई, बळीराम केवटे, ज्ञानेश्वर भोई, संदीप नगरे, शंकर नगरे, गणेश परदेशी, जाफर मुलाणी, लाला मुलाणी यासह मच्छिमार उपस्थित होते.