अरूणकुमार मोटे
सविंदणे – शिरुर पोलीस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी औट पोस्टच्या अंतर्गत 19 गावे आहेत. अंदाजे लोकसंख्या 50 हजार आहे. त्यामानाने एक पोलीस अधिकारी व चार कर्मचारी या 19 गावांचा भार उचलत आहेत. टाकळी हाजी अंतर्गत चार कर्मचारी शिरूर पोलीस ठाण्याचा भार उचलत असल्यामुळे गुन्ह्यांची मालिका अखंडीत सुरू आहे. त्यामुळे “भय इथले संपत नाही, अशी अवस्था परिसरातील गावकऱ्यांची झाली आहे.
शिरूर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या टाकळी हाजी परिसरातील गावे आहेत. या परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न योग्य रितीने हाताळता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाने टाकळी हाजी येथे औट पोस्ट सुरू केले आहे. या औट पोस्टमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आहे. त्यात चार पोलीस कर्मचारी दिमतीला दिले आहेत. त्यांच्यावर 19 गावांचा गाडा हाकण्याची वेळ आली आहे. त्यातही या कर्मचाऱ्यांना शिरूर पोलीस स्टेशनमध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनला जावे लागते.
सध्या टाकळी हाजी औट पोस्टच्या हद्दीमध्ये विद्युत रोहित्र, विद्युत मोटारी, वाहनचोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. सविंदणे, कवठे येमाई, रावडेवाडी, मलठण लाखेवाडी परिसरात अनेक चोऱ्या झाल्या आहेत. या चोऱ्यांचा छडा लावण्याचे पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान दिले आहे. परिसरातील नागरिक रात्रीच्यावेळी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. सध्या या भागामध्ये शेतीच्या, विहिरीच्या, मजुरीच्या कामासाठी बाहेरगावावरून अनेक कामगार झोपडी टाकून वास्त्यव्यास आले आहेत. त्यांची ग्रामपंचायत दप्तरी कोणतीही नोंद नाही. बाहेरून आलेल्या कामगारांकडून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच मलठण येथे कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या दोन कामगारांना चोरीच्या गुन्ह्यात फलटण पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. ते मलठणय येथे भाड्याची खोली घेऊन वास्तव्यास होते. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी करून प्रत्येक कामगाराचे आधारकार्ड घेऊन नोंद असणे आवश्यक आहे.
अन्यथा त्यांना गावामध्ये राहण्यास मज्जाव करावा, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. टाकळी हाजी औट पोस्टमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक, दोन जमादार, दोन कॉन्स्टेबल आहेत. त्यांना प्रत्येक गावांमध्ये तक्रारीनुसार पोहचता येत नाही. शिरुर पोलीस स्टेशनमधील कामांचा निपटारा करण्याची नसती आफत त्यांच्यावर ओढावली आहे. राज्य शासनाने लवकर लोकसंख्येच्या मानाने जास्त कर्मचारी टाकळी औट पोस्टला नेमावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाहेरून कामानिमित्त गावामध्ये भाड्याने वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तींची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आवश्यक आहे. घर भाड्याने देताना भाडेकरार करावा. ओळखपत्र घ्यावे. विनापरवाना भाड्याने खोली दिल्यास खोली मालकावर गुन्हे दाखल केले जातील. स्टाफ कमी असल्यामुळे प्रत्येक गावात पोहचणे शक्य होत नाही. बाहेरील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली वाटल्यास पोलीस स्टेशनला तात्काळ संपर्क करावा. या भागातील चोऱ्यांचा लवकरच छडा लावून आरोपी गजाआड केले जातील.
भगवान पालवे, पोलीस उपनिरीक्षक, औट पोस्ट टाकळीहाजी