काऱ्हाटीतील शेतकऱ्यांचा सवाल
काऱ्हाटी – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत काऱ्हाटी (ता. बारामती) येथे जमीन पाहणी कार्यक्रम पार पडला. 2018 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज केला होता, त्यांच्या जमिनीची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. दरम्यान, शासनाला वर्षभरानंतर या योजनेची आठवण झाली का? असा खोचक सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
यामध्ये शेतकरी बाळासाहेब वाबळे, विजय वाबळे, संजय वाबळे, प्रवीण लोणकर, विकास लोणकर, प्रमोद लोणकर, संदीप लोणकर, हेमंत लोणकर या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता, त्याची पाहणी करण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे विजयकुमार गायकवाड, तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार महादेव भोसले, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, कृषी सहाय्यक अमोल लोणकर, तलाठी एस. एस. भुसेवाड, कोतवाल शेखर खंडाळे, पोलीस पाटील संजय लोणकर, ग्राहक मंच उपाध्यक्ष उत्तम वाबळे, तात्याबा लोणकर, नवनाथ खंडाळे, दत्तात्रय लोणकर आदी उपस्थित होते.
दारिद्य्ररेषेखालील भूमिहीन अनुसुचित जाती व नवबौद्ध शेतमजुर कुटुंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांचे राहणीमानात सुधारणा व्हावी, त्याचे शेतमजुरीवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे, या उेद्शाने शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना राबविण्यात येत आहे. ही योजना 2004 पासुन सुरु केली आहे. या योजनेद्वारे अनुसुचित जाती व नवबौद्ध भूमीहीन शेतमजुरांना 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीताखालील जमीन शासकीय दराने खरेदी करुन शासनाकडून 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.