मिलन म्हेत्रे
डेसिबल मोजण्याच्या यंत्रांची कमतरता
पुणे – दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र आले की डॉल्बी, स्पीकरच्या आवाजाच्या नियंत्रणाचा विषय ऐरणीवर येतो, शांतेत उत्सव साजरे करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाते. या संदर्भात प्रत्येक पोलीस ठाणे, चौकीचे अधिकारी गणेश मंडळाच्या बैठकीत घेत आहेत, पण त्याकडे गणेश मंडळांकडून उत्सव काळात दुर्लक्ष केले जाते.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सव शांततेत आणि डॉल्बी-स्पीकरविरहीत साजरा करण्याबाबत पोलीस अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांच्या बैठका सुरू आहे. यावेळी कार्यकर्ते ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याच्या शपथा घेतात; पण कार्यकर्त्यांची मानसिकता या प्रदूषणाबाबत जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसणार आहे.
विसर्जन मिरणूक काळात तर या सगळ्याच गोष्टींचा कळस होतो. काही मंडळांचा अपवाद वगळता उच्चांकाने स्पीकरच्या भिंती बनवल्या जातात, डॉल्बींचा सर्रास वापर होतो. त्यानंतर या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते, त्याची आकडेवारीही प्रसिद्ध होते. मात्र, पुढे त्यांच्यावरील खटले मागे घेऊन प्रकरणे संपविण्यात येतात आणि उत्सव शांततेत आणि पावित्र्यात सादर केला गेल्याची कागदोपत्री केवळ नोंद राहते.
करोडोंची उलाढाल
स्पीकर, डॉल्बीच्या व्यवसायात उत्सवकाळात करोडोंची उलाढाल होते. यात स्वतःचीच साऊंड सिस्टिम असावी, असा कल असतो. अशा साऊंड सिस्टिमची पुण्यात मोठी बाजारपेठ आहे, तिथून विकत आणून हे स्पीकर वापरले जातात. उत्सवानंतर विविध कार्यक्रमांसाठी सिस्टिम भाड्याने दिली जाते, त्यातून सार्वजनिक मंडळांना उत्पन्न मिळते.
सीसीटीव्हींची गरज
सध्याची देशातील संवेदनशील परिस्थिती पाहता सर्वच मंडळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याकडे देखील सार्वजनिक मंडळांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. डॉल्बी-स्पीकरवर लाखो रुपयांचा होणारा खर्च सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसाठी वापरला तर मंडळांकडून विधायक कार्य होऊ शकते.मिरवणुकीत वाजवले जाणारे स्पीकर अथवा डॉल्बी यांच्या आवाजाची क्षमता मोजण्यासाठी आवश्यक असणारी मापन यंत्रणा पोलीस स्टेशनमध्ये पुरेशी संख्येत नाही, अथवा सुस्थितीत नसते, त्यामुळे याचे मापन योग्य होऊन कारवाई होण्यास अडथळे येतात. मिरवणूक काळात 2 बेस आणि एक टॉपचीच मर्यादा आहे.
काय आहे नियम…
काही महत्त्वाचे भाग हे शांतता प्रवण आहेत, त्याबाबतचे फलक हे अत्यंत छोट्या आकाराचे, दिसणार नाहीत, असे लावले जातात. फेब्रुवारी 2000 मध्ये देशभरात ध्वनिप्रदूषणाबाबत नियम लागू केले आहेत. त्यानुसार निवासी, व्यावसायिक आणि औद्यगिक याबरोबरच रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळ, न्यायालयांपासून 100 मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे. शांतता क्षेत्रात सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत 50 (ए) डेसिबल, तर रात्री 40 (ए) डेसिबल, निवासी क्षेत्रात 55 (ए) डेसिबल तर रात्री 45 (ए) डेसिबलची मर्यादा आहे.
ध्वनिप्रदूषणाबाबत असलेल्या नियमावलीची प्रत प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीवेळी दिली जाते. प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार एक ध्वनिपातळी मोजणी संच असतो. मिरवुणका सुरू झाल्यावर आणि नंतरच्या काळात ध्वनिप्रदूषण पातळीची मोजणी ठिकठिकाणी केली जाते. त्यानुसार ज्या मंडळाने या पातळीचे उल्लंघन केले असेल त्यांना तसे कळवले जाते आणि त्यावर कारवाई होते.
– डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक, लोणीकंदसाधारण प्रत्येक पोलीस ठाण्याकडे एक ध्वनिक्षमता मोजणी यंत्र असते. या मोजणी यंत्राद्वारे मिरवणूक काळात ध्वनिपातळी मोजली जाते. आलेल्या आकडेवारीची पावती तिथल्या तिथेच मंडळांना दिली जाऊन त्यांच्या गाड्या अथवा साऊंड सिस्टिम्स जप्त केल्या जातात आणि पुढील कारवाई न्यायालयाच्या निर्णयानुसार होते.
– टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक, आळेफाटा