महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे संयुक्त सरकार येणार हे निश्चित झाले असतानाच भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे मान्य केल्याचे आणि तसा प्रस्ताव मातोश्रीवर सादर केल्याच्या बातम्या येत आहेत, हे खरे असेल तर याचे वर्णन केवळ उशिरा सुचलेले शहाणपण असेच करावे लागेल. कारण आता शिवसेना खूप पुढे निघून गेली आहे आणि आता मागे वळून भाजपसाठी मैत्रीचा हात पुढे करेल अशी अजिबात शक्यता नाही. राजकीय रणनीती आणि कुरघोड्या यामध्ये स्वतःला मास्टर समजणाऱ्या भाजपचा डाव चुकला हेच यातून समोर येत आहे. शिवसेनेची जी मागणी आता पूर्ण करण्याची तयारी भाजपने दाखवली आहे ती मागणी पूर्वीच मान्य केली असती तर राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला नसता आणि शिवसेनेला नवीन मित्र शोधण्याची गरजही वाटली नसती.
शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते, असे भाजपने गेल्या काही दिवसांच्या सत्तासंघर्षात वारंवार स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीच्या चर्चेत अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय झाला होता, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सतत केला होता, पण भाजपने हा दावा फेटाळून लावला. असा कोणताही निर्णयच झाला नव्हता, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्यापासून उद्धव ठाकरे यांनी भाजपशी चर्चा करण्याचे टाळले होते. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत कोणतीही चर्चाच झाली नव्हती, असे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सांगितले होते. म्हणूनच यावेळी राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी दोस्ती करावी लागली आहे.
आपल्याला आता विरोधी बाकांवरच बसावे लागणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपला शिवसेनेशी मैत्री करण्याचे हे शहाणपण सुचले आहे. खरेतर ही विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी महायुती म्हणून लढवली होती. मतदारांनी त्यांना महायुती म्हणूनच कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी 220 जागा जिंकण्याच्या बाता मारणाऱ्या महायुतीला मतदारांनी जेमतेम बहुमतावर आणून बसवले होते. भाजपच्या 105 आणि शिवसेनेच्या 56 जागा मिळून अतिशय सहजपणे सरकार स्थापन करणे शक्य होते. पण भाजपचा दुराग्रह आणि शिवसेनेचा टोकाचा हट्ट यामुळे काहीच होऊ शकले नाही. उद्धव ठाकरे सतत मुख्यमंत्री आमचाच होणार, असे म्हणत असताना भाजपकडून कधीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला नाही. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले होते; पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या दोन नेत्यांची साधी भेटही झाली नाही.
दोघांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. शिवसेना त्यानंतर संजय राऊत यांच्यामार्फत सतत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे सांगत असतानाही भाजपने शिवसेनेशी संपर्क साधला नाही. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करेल याची खात्री भाजपला नसावी. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते सतत आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मिळाला आहे, असे सांगत असल्याने अशी कोणती युती होऊ शकते याची चाहूल भाजपला लागली नसावी. भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधून सत्तेच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. खरेतर शिवसेना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जो संवाद सुरू झाला तसा संवाद भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये झाला असता तर राज्यात कोणताच राजकीय पेच निर्माण झाला नसता.
समान विचाराचे आणि निवडणूकपूर्व युती असलेले पक्ष सत्तेवर आले असते; पण भाजपच्या नेत्यांचा इगो आड आल्याने तसे होऊ शकले नाही. आता विरोधी बाकांवर बसण्याची पाळी आली आहे. थोडी तडजोड केली असती तर सत्तेचे अर्धे वाटप करून किमान सत्तेत तरी राहता आले असते. शिवसेनेने आपल्याला जे पाहिजे ते साध्य केले आहे; पण भाजपचे मात्र नुकसान झाले आहे. अर्थात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर सत्तेचा संसार करताना शिवसेनेला तडजोड करावीच लागणार आहे. किमान समान कार्यक्रमावर सतत राबवताना दमछाक होणार आहेच. शिवसेनेबरोबर सत्तेत येणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा आणि सत्ता राबवण्याचा चांगला अनुभव आहे. सारे नेते दिग्गज आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्रिपद झाकोळून जाईल, असे काम ते करू शकतात. पण मुख्यमंत्रिपद मिळवणे हा एककलमी कार्यक्रम डोक्यात असल्यानेच शिवसेनेने ही तडजोड केली आहे.
हे सरकार पाच वर्षे चालेल, असे शरद पवार यांनी म्हटले असले तरी अशा प्रकारचे विजातीय प्रयोग फारकाळ यशस्वी झाल्याची देशात उदाहरणे नाहीत. योग्य संधी येताच सरकारमधून बाहेर पडणे यासाठीच अशा तडजोडी केल्या जातात. शिवसेनेकडे पुन्हा मैत्रीचा हात पुढे करताना भाजपला हेच अप्रत्यक्षपणे सुचवायचे आहे. पण सध्यातरी शिवसेना आपले मुख्यमंत्रिपदाचे ध्येय गाठण्यासाठी वाटेल ती तडजोड करण्यास तयार आहे. पुढचे पुढे पाहू हाच दृष्टिकोन शिवसेनेचा आहे. तसे बघायला गेले तर नव्या सरकारमध्ये सत्तेचे समान वाटप नाही तर एक तृतीयांश वाटप होणार आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांपेक्षा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एकत्रित संख्या जास्त असणार आहे; पण हे शिवसेनेला मान्य करावेच लागणार आहे. नजीकच्या काळात सरकारमध्ये काही मतभेद उद्भवले आणि सरकार संकटात आले तर तेव्हाच भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात. पण सत्तेचे आकर्षण जबरदस्त असल्याने सर्व वादविवाद बाजूला ठेवून शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून राज्यात सत्ता राबवली जाईल. दुसरीकडे शिवसेनेशी तडजोड करण्याचे शहाणपण उशिरा सुचल्याने भाजपला मात्र आता विरोधी पक्षाचे राजकारण करावे लागणार आहे.