पिंपरी – महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अत्यंत गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शासकीय अनुदानातून शालेय पोषण आहार दिला जातो. पोषण आहार वाटप करणाऱ्या सवित्री स्वयंरोज संस्थेकडून विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या शालेय खिचडीत चक्क अळ्या, काचा, केस आणि प्लॅस्टिकचे तुकडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या संस्थेला केवळ नोटीस बजावून प्रशासन सोडून देत आहे. आजतागायत संबंधित संस्थेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित संस्थेच्या अनागोंदी कारभाराला शिक्षण विभागाच्या उपायुक्तांचाही छुपा पाठिंबा आहे का? असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना शासकीय अनुदानातून शालेय पोषण आहार पुरविला जातो. एकूण 21 खासगी संस्थांना शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम दिले. यामध्ये अन्नामृत फाउंडेशन या इस्कान मंदिराच्या संस्थेकडून सर्वाधिक 19 हजार 100 विद्यार्थ्यांना आहार पुरविला जातो. तर, उर्वरित आहार पुरविण्याचे काम बचत गट व महिला स्वयंरोजगार संस्थांना दिले आहे. यात बहुतांशी राजकीय व्यक्तींच्या संबधातील संस्था आहेत. राजकीय नेत्यांशी संबंधित संस्थांना पोसण्यासाठी सुरू असलेल्या या उद्योगामुळे पालिका शाळांमधील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी व जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.
मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारींमुळे सावित्री महिला स्बयंरोजगार नावाच्या संस्थेकडून पुरविलेल्या भातात चक्क केस, अळ्यांसह काचा, प्लॅस्टिकचे तुकडे आढळून आल्याची गंभीर बाब समोर आली. याच संस्थेच्या शालेय पोषण आहाराबाबत वेगवेगळ्या सात शाळांमधून तक्रारी प्राप्त झाल्या. तरी देखील शिक्षण विभाग आणि या विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी या संस्थेवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी दिलेल्या नोटिसांना देखील संस्थेने जुमानले नाही. नोटीसमध्ये पोषण आहारात अळ्या, काचा व प्लॅस्टिकचे तुकडे आढळल्याचा उल्लेख आहे. मात्र, उपायुक्त याची माहिती व नोटीसची प्रत देण्यास टाळाटाळ केली. राजकीय दबावाखाली उपायुक्त विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याची मुभा देत आहेत का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
चार महिन्यांनंतरही कारवाईस टाळाटाळ
“सावित्री’ संस्थेच्या शालेय पोषण आहाराबाबत पहिली तक्रार 25 ऑगस्ट 2022 रोजी प्राप्त झाली. त्यानंतर वारंवार शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये कस्पटे वस्ती, क्रमांक 39 प्राथमिक शाळा, मोहनगर लिलाबाई खिवंसरा प्राथमिक शाळा, 27/2 वाकड शाळा, भूमकर वस्ती प्राथमिक शाळा, सावित्रीबाई फुले शाळा मोहनगर आणि माध्यमिक विद्यालय काळभोर इत्यादी शाळांमधून शालेय पोषण आहाराबाबात तक्रारी आलेल्या आहेत. तरीही, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी नोटीस पाठविण्याव्यतिरिक्त संस्थेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. संस्थेला पाठीशी घालण्याचा उपायुक्तांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप होत आहे.