पुणे – लॉकडाऊनचा परिणाम हा साखर बाजारावर झाला आहे. साखरेचा साठा मोठ्या प्रमाणावर असूनही वाहतूक विस्कळित असल्याने देशभरातील बाजारात साखरेचा तुटवडा जाणवू लागला आहे.
गेले महिनाभर देशभरात लॉकडाऊन आहे. त्यात 15 एप्रिलपर्यंत वाहतूक सेवा बंद होती. या पार्श्वभूमीवर सध्या साखर कारखान्यांकडे साखर उपलब्ध आहे, पण वाहतूक नसल्यामुळे ती गोदामात पडून आहे. तर व्यापाऱ्यांकडील साखरेचा साठा संपत आहे. यासंदर्भात ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊन जाहीर होण्याआधी देशभरात सुमारे दहा ते पंधरा लाख टन साखर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातच सध्या हॉटेल तसेच मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे त्यांच्याकडून होणारी साखरेची मागणी कमी झाली आहे. ती साखर सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध होत आहे, असेही असोसिएशनने सांगितले आहे.