पाटण तालुक्यातील वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांचा हात असल्याचा नागरिकांचा संशय
अंकुश महाडिक
सणबूर – सतत या ना त्या कारणाने चर्चेत असणारे पाटण तालुक्यातील वन्यजीव विभागाचे ढेबेवाडी कार्यालय आटोली गावच्या हद्दीतील सप्तरंगी औषधी वनस्पतीच्या तस्करीने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गत एप्रिल महिन्यात वन्यजीव विभागाने आटोली गावच्या वनहद्दीतून जवळपास 2 टन सप्तरंगी औषधी वनस्पती जप्त करून ढेबेवाडी येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात ठेवलेली आहे. जिची किंमत लाखोच्या घरात आहे. सह्याद्री पठारावरील निवी कसणीपासून वाल्मिकी ते आटोली पर्यंतची अनेक गावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर झोन मध्ये येत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रादेशिक वन विभागाकडून वनक्षेत्रपाल वन्यजीव ढेबेवाडी विभागाकडे वर्ग केलेले आहे.
वनहद्दीतील वन्यजीव, वनसंपत्ती यांच्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी या विभागाची आहे. एक स्वतंत्र खाते, मुबलक निधी, पुरेसा कर्मचारी वर्ग या विभागाला उपलब्ध असल्याने काम करणे सोपे असताना केवळ काही अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लालसेमुळे संपूर्ण खाते बदनाम होत आहे. गेल्या एप्रिल महिन्यातील आटोली गावच्या वनहद्दीमध्ये घडलेल्या सप्तरंगी या औषधी वनस्पतीच्या तस्करीने खरेतर संपूर्ण वन्यजीव खाते खडबडून जागे होणे गरजेचे होते.
सप्तरंगी ही सह्याद्री पठारावर सापडणारी अत्यंत दुर्मिळ औषधी वनस्पती आहे. तिला ग्रामीण भाषेमध्ये गुळवेल, गेळू नावाने देखील ओळखले जाते. तिचा उपयोग मधुमेह या आजारावर केला जातो. वेलीसारख्या असणाऱ्या या वनस्पतीच्या खोडामधील गरचा उपयोग मधुमेह या आजारावरील औषधांमध्ये केला जातो. त्यामुळे या वनस्पतीची तस्करी होणे स्वाभाविकच आहे. हे वन्यजीव विभागाला देखील माहिती असताना त्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे होते. परंतु आटोली वनविभागात घडलेल्या या तस्करीत जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची चर्चा या विभागातील नागरिकांमध्ये आहे. या तस्करीच्यामागे फार मोठे रॅकेट असून या कारवाईअगोदर शेकडो टन औषधी वनस्पतीची तस्करी या विभागातून कोणाच्या तरी आशीर्वादाने झाल्याची देखील चर्चा आहे.
या प्रकरणाची कसून चौकशी केल्यास मागे घडलेल्या नरक्याच्या तस्करी पेक्षाही मोठी तस्करी झाल्याचे समोर येईल. परंतु तपास करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर याच खात्यातील कोणत्यातरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे जाणवते. त्यामुळे मुद्देमाल जप्त करून आज जवळपास महिना होत आला तरी एकाही आरोपीला अटक झालेली नाही. केवळ चौकशीचा फार्स असल्याचे दिसून येते. काही दिवस असेच फार्स करून मग आरोपी मिळत नाहीत. असे दाखवून तपास कधी बंद केला जाईल हे देखील समजणार नाही. संपूर्ण प्रकरण पाहता तपास करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांस वन्यजीव विभागाने पाठबळ देऊन तातडीने झारीतील शुक्राचार्यांना गजाआड केले तरच अशा प्रवृत्तीना आळा बसेल. अन्यथा दुर्मिळ औषधी वनस्पतीनी समृध्द असणारे सह्याद्री पठार कधी उजाड होईल हे कळणार नाही.