काठमांडू – मुसळधार पावसामुळे मध्य नेपाळमध्ये झालेल्या भूस्खलनात कमीतकमी 11 लोक ठार झाले आहेत. मृतांमध्ये 7 महिलांचाही समावेश आहे. या भूस्खलनामध्ये 20 जण बेपत्ता झाले अहेत, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
काठमांडूच्या पूर्वेस 120 किलोमीटर अंतरावरील सिंधुपाल्चुक जिल्ह्यातील बार्हाबिसे ग्रामीण नगरपालिकेच्या भिरखारका भागात शनिवारी रात्री दरडी कोसळण्याने किमान 15 घरांचे नुकसान झाले आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी नेपाळ लष्कर आणि नेपाळ पोलिस कर्मचाऱ्यांची सुरक्षा पथके घटनास्थळी पाठविण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या 2 दिवसांपासून नेपाळमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. नेपाळ-तिबेट सीमा भागातील भूस्खलन प्रवण भागातील 247 घरे धोकादायक म्हणून जाहीर केली गेली आहेत. या भागातील नागरिकांनी आपल्याला सुरक्षित ठिकाणी हलव्ण्याची मागणी केली होती. त्यानंतरही सरकारकडून त्वरित उपय योजना केल्या गेल्या नाहीत.
या पावसाळ्यात बार्हाबिसे ग्रामीण नगरपालिका क्षेत्रात झालेली भूस्खलनाची ही दुसरी मोठी घटना आहे. नेपाळमध्ये या पावसाळ्यात ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 249 जण ठार झाले, तर 49 जण बेपत्ता झाले आहेत.