नवी दिल्ली – चारा घोटाळा प्रकरणात सध्या शिक्षा भोगत असलेले राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात आम्ही लालूंना मोकळे सोडण्यास राजी नाही असा अभिप्राय व्यक्त करीत सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला आहे. गेले 24 महिने आपण कारागृहात आहोत असे लालुंच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले होते.
पण तुम्हाला या घोटाळा प्रकरणात चौदा वर्षांची शिक्षा झाली असताना तुम्ही केवळ 24 महिने कारागृहात आहात म्हणजे हा काही फार काळ मानता येणार नाही असे स्पष्टमतही न्यायालयाने नोंदवले आहे. लालूंच्या जामीन अर्जाला सीबीआयने या आधीही कडाडून विरोध केला होता. आजारपणाचा दावा करणारे हे नेते निवडणूक प्रचारात मात्र अचानक कसे फीट असतात असा आक्षेप सीबीआयकडून त्यांच्या बाबतीत घेण्यात आला होता.