पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल उशीरापर्यंत पूर्णत: स्पष्ट झालेला नव्हता. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताचा आकडा पार करेल असे चित्र प्राप्त झाले होते.
नितीश यांना ही निवडणूक अत्यंत खडतर गेली. किंबहुना त्यांचा आता परतीचा प्रवास सुरू झाल्याचेही बोलले गेले. मात्र तरीही सत्ता राखण्यात त्यांच्या नेतृत्वाखालील रालोआला यश मिळाले आहे. निवडणुकीत जय- पराजय होत असतो. त्यांची कारणमीमांसाही होते.
विश्लेषणही केले जाते. मात्र राजकीय दृष्ट्या अतिशय सजग मानल्या जाणाऱ्या बिहारने एक बाब या निवडणुकीतही पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. ती म्हणजे लालू प्रसाद यादव अथवा त्यांच्या कुटुंबाकडे सत्ता नसली तरी बिहारमध्ये आजही लालूंची तेवढीच ताकद आहे, जी त्यांच्या उमेदीच्या काळात होती.
लालू यादव, नितीश कुमार आणि दिवंगत रामविलास पासवान यांचा राजकीय कालखंड साधारण सारखाच. तिघा नेत्यांनी बिहारच्या राजकारणावर आपला वरचष्मा निर्माण केलेला. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून बिहारच्या राजकारणाला हे तीन रत्न प्राप्त झाले.
त्यातले पहिले दीड दशक लालू व नंतरचे दीड दशक नितीश यांच्याकडे राज्याची धुरा राहीली. पासवान यांना राज्यात एकहाती सत्ता मिळाली नाही. मात्र तरीही ते कायम सत्तेत राहीले. त्यामुळे राजकारणात आपली पत आणि प्रभाव इतकी वर्षे टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले.
गेल्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले होते. महाराष्ट्रात आज यशस्वीपणे सुरू असलेला महाआघाडीचा प्रयोग 2015 मध्येच बिहारमध्ये राबवला गेला.
मात्र लालूपुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्याशी फारसे जुळवून घेता न आल्याने किंवा भविष्यातील आपली गणिते जोखत भाजपसोबत जाण्यातच राजकीय शहाणपण आहे, असा सूज्ञ विचार करत नितीश यांनी आपली वाट वेगळी केली. अगोदर त्यांनी राजीनामा दिला. महाआघाडीतील सगळ्या घटकपक्षांना बुचकळ्यात टाकले आणि नंतर पुन्हा भाजपच्या साथीने ते सत्तेवर विराजमान झाले.
एकट्या तेजस्वींनी आणले जेरीस
नितीश यांच्या नेतृत्वाखाली तेजस्वी हे लालूंचे कनिष्ठ पुत्र उपमुख्यमंत्री होते. भाजपने त्यांनाच लक्ष्य केले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तुरूंगात असलेल्या लालूंच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरच भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडाले. सरकार बदनाम होत असल्यामुळे आपली सुशासन बाबू प्रतिमा कायम ठेवण्यासाठी नितीश यांनी तेजस्वी यांना राजीनामा द्यायला सांगितले आणि तेथूनच दोन्ही पक्षांचे मार्ग बदलले.
तेजस्वी तरूण आहेत. त्यांचा पिता तुरूंगात आहे. राजकारणात हयात घालवलेल्या नितीश यांच्याशी त्यांची टक्कर होती. सोबत भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि किमान डझनभर केंद्रीय मंत्री एवढा फौजफाटा भाजपने कामाला लावला असतानाही तेजस्वी यांनी जोरदार टक्कर दिली.
ती इतकी जोरदार होती की मतदानोत्तर चाचणीतही तेजस्वी यांच्याच बाजूने मतदारांचा कौल असणार असा अंदाज सर्व चाचण्यांतून व्यक्त करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी गल्लत झाली. फासे उलट पडले व बिहारची सत्ता तेजस्वी यांच्या हातातून थोडक्यात निसटली.
2020 च्या बिहारच्या निवडणूकीचे विश्लेषण करायचे म्हटले तर एकट्या तेजस्वी यादव यांच्याभोवतीच ती फिरल्याचे स्पष्ट म्हणता येऊ शकते. लाखांच्या सभा घेउन मतदान फिरवण्याची क्षमता असलेले नरेंद्र मोदीही यंदा तेजस्वी फॅक्टरपुढे हतबल झालेले दिसले.
नितीश यांची अवस्था तर त्याहून दयनीय झाली होती.
एकीकडे रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी त्यांना जेरीस आणले असतानाच तेजस्वी यांनी खेचलेली गर्दी नितीश यांना धडकी भरवण्यासाठी पुरेसी होती. काय वाढून ठेवले आहे, त्याचा अंदाज नितीश यांना आला नसता तरच नवल होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या भात्यातील अखेरचे अस्त्र बाहेर पाडले.
आवाहनाला मिळाला प्रतिसाद?
ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन त्यांनी मतदार राजाला केले. त्यांच्या या आवाहनाद्वारे त्यांनी मोठा जुगार खेळला होता. नितीश यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांनी पराभव मान्य केला वगैरे टीका होणार याचा अंदाज त्यांना असणारच. मात्र बिहारमधील जो प्रगल्भ मतदार वर्ग आहे, त्याला हात घालण्याचे काम या आवाहनाने केले.
प्रगल्भ अशा अर्थाने की वयाची पन्नाशी ओलांडली अथवा त्या घरात असलेला हा वर्ग आहे. त्याने लालू-राबडी राजवट पाहिली होती. त्या काळात झालेले घोटाळेही पाहिले होते. बाहुबली नेत्यांचा धिंगाणाही पाहिला होता. या नेत्यांच्या छत्रछायेत वाढलेली आणि फोफावलेली अपहरण इंडस्ट्रीही पाहिली होती. नितीश यांनी बिहारचा भलेही प्रगत महाराष्ट्र केला नसेल अथवा प्रगतीशील राज्यांच्या पंक्तीत राज्याला नेउन बसवले नसेल. मात्र बिहारमधील त्यावेळच्या समाजाची गरज होती, ती सुरक्षितता. ती त्यांनी नागरिकांना दिली.
अपहरणाच्या उद्योगाला ब्रेक लावला आणि खंडणी, भ्रष्टाचाराचे राज्य संपवले. आपल्याला पोषक जातीची समीकरणे राखत त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतील पहिली पाच वर्षे तरी जनतेला आश्वासक चित्र दाखवले. चमत्कार भलेही त्यांनी केला नसेल. मात्र त्यांनी असुरक्षिततेची भावना बऱ्यापैकी संपवली. कुठेतरी याच मतदाराने त्यांना अखेरची संधी दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकमात्र नक्की की नितीश यांची स्वच्छ प्रतिमा आणि गेल्या सुमारे दीड दशकातला कारभार जरी असला तरी लालू नावाची जी शक्ती बिहारमध्ये होती ती आजही कायम आहे. बऱ्याच काळापासून तुरूंगात असूनही त्यांची ताकद तसूभरही कमी झाली नसल्याचे प्रत्येक निवडणुकीत सिध्द होत आहे. त्यांनी जोडलेला मुस्लिम आणि यादव हा वर्ग आजही त्यांच्याच सोबत आहे.
आताही तेजस्वींच्या नेतृत्वाखाली या पक्षाने मारलेली मुसंडी तेच दर्शवते आहे. ज्या पक्षांची रचना एकचालकानुवर्तित्व अशा स्वरूपाची असते, तेथे नेतृत्वाला ग्रहण लागले की पक्षाचा डोलारा कोसळतो. लालूंच्या पक्षाचे तसे झाले नाही. त्यांची जागाही त्यांच्या मुलाने सहजपणे घेतली. हा पराभव जरी असला तरी तो तेजस्वी यांना शहाणपण देउन जाणारा आणि अधिक अनुभव समृध्द करून जाणारा असेल एवढे मात्र निश्चित.
बिहारचा कौल 2010:
पक्ष मतांची टक्केवारी जागा
भाजप 16.49 91
राजद 18.82 22
संयुक्त जनता दल 22.58 115
2015 च्या निवडणुकीत भाजपला एकाकी पाडत संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाने एकत्र येत महाआघाडी स्थापन केली. कॉंग्रेस पक्षालाही त्यांनी सोबत घेतले. त्यात राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक 80 तर संयुक्त जनता दलाला 71 जागा मिळाल्या.
कॉंग्रेसने 27 जागा पटकावल्या होत्या. 2015 च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत राजदची ताकद आणखी वाढली होती. त्यांची मतांची टक्केवारी तर वाढलीच, मात्र जागाही वाढल्या व तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. कॉंग्रेसच्या मतांची टक्केवारी जैसे थे राहीली.