पटना ( lalu prasad yadav ) – देशातील करोना लसीकरण मोहिमेवरून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. देशात सध्या सुरु असलेल्या करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची तुलना त्यांनी १९९६-१९९७च्या पोलिओ लसीकरण मोहिमेशी करत, ‘केंद्रातील मोदी सरकार पैसे घेऊन सुद्धा जनतेचे लसीकरण करू शकत नाही’ असा टोला लगावलाय.
याबाबत बोलताना लालू प्रसाद यादव म्हणतात, ‘१९९६-१९९७मध्ये जेव्हा देशात समाजवादी विचारांचे सरकार होते, ज्याचा मी अध्यक्ष होतो, तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरण मोहिमेचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी आजसारखी जागरूक जनता व सोयीसुविधांचा अभाव असताना देखील आम्ही ०७ डिसेंबर १९९६ पर्यंत ११.७४ कोटी तर १८ जानेवारी १९९७ पर्यंत १२.७३ कोटी बालकांचे पोलिओ लसीकरण केले होते. तो भारताचा विश्वविक्रम होता. त्यावेळी लोकांच्या मनामध्ये लसीबाबत शंकाकुशंका होत्या. मात्र तरीदेखील राष्ट्रीय जनता दलाचा समावेश असलेल्या समाजवादी सरकारने येणाऱ्या पिढयांना पोलिओ आजाराचा सामना करावा लागणार नाही या दृढ निश्चयाच्या पाठबळावर ही मोहीम यशस्वी केली.”
“मात्र देशातील सद्य परिस्थिती पाहून दुःख होते. केंद्रातील विश्वगुरू सरकार पैसे घेऊनही आपल्यानागरिकांना लस उपलब्ध करून देऊ शकत नाही. मी पंतप्रधानांना विनंती करतो की, या जीवघेण्या महामारीपासून देशातील जनतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी देशव्यापी मोफत लसीकरण मोहिमेची घोषणा करावी.” असं आवाहन यादव यांनी पंतप्रधान मोदींना केलं.
यावेळी बोलताना यादव यांनी, “राज्य व केंद्र सरकारला लसीची खरेदी करताना मोजावी लागणारी किंमत वेगवेगळी असू नये. विविध राज्य एकत्र आल्यानंतरच देश बनत असतो. लसीकरण ही केंद्र सरकारची जबाबदारी असून देशातील प्रत्येक नागरिकाचे टप्प्याटप्प्याने मोफत लसीकरण व्हायला हवे” अशी भूमिका देखील मांडली.
तत्पूर्वी, चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने १७ एप्रिलरोजी जमीन मंजूर केला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं दिसून येतंय. कालच (रविवारी) त्यांनी प्रकृतिस्वास्थ्य ठीक नसतानाही राजद कार्यकर्त्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी ८५ इतकी खालावली असतानाही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केल्याचे वृत्त आहे.