पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा समस्तीपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा बचाव केला. लालू यांच्यावर नव्याने दाखल करण्यात आलेल्या खटल्यांच्या अनुशंगाने त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय जनता दलासोबत आलो आहे तेव्हा तेव्हा त्यांनी लालू यांच्या विरोधात प्रकरणे दाखल केली आहे. आताही आम्ही एकत्र आल्यावर पुन्हा नवी प्रकरणे सुरू करण्यात आली असल्याचे नितीश यांनी म्हटले आहे. जमीनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणाचा उल्लेख करून नितीश म्हणाले की त्यांच्याकडे या प्रकरणात काहीच पुरावे नव्हते.
आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी केस दाखल केली. त्यामुळे हे लोक म्हणजे भाजप कसे काम करते ते समजून घ्या. आपण जेवढे समाजवादी लोक आहोत ते सगळे एकत्र राहु, देशाच्या आणि बिहारच्या प्रगतीत हातभार लावू व बिहारला पुढे नेऊ. आपण आयुष्यात आता पुन्हा कधीच भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.