नवी दिल्ली – कॉंग्रेस, राजद आणि इतर पक्षांचा समावेश असणारी बिहारमधील विरोधकांची महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. अशात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी कॉंग्रेसवर थेट निशाणा साधताना त्या पक्षाच्या उपयुक्ततेवरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बिहार विधानसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीवरून कॉंग्रेस आणि राजदमधील संबंध ताणले गेले. त्या जागांवर राजदने आपले उमेदवार दिले. मात्र, आम्हाला विचारात न घेतल्याचा आक्षेप घेत कॉंग्रेसने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले. अशात बिहार कॉंग्रेसचे प्रभारी भक्तचरण दास यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस बिहारमधील सर्व 40 जागा लढवेल, अशी घोषणा केली.
त्यामुळे विरोधकांची महाआघाडी फुटण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे. त्याबाबतचा प्रश्न दिल्लीत रविवारी पत्रकारांनी लालूंना विचारला. त्यावर त्यांनी उसळून कॉंग्रेसच्या दृष्टीने आघाडी म्हणजे काय?
त्या पक्षाला हरण्यासाठी, डिपॉझिट जप्त होण्यासाठी जागा सोडायची का, असे प्रतिसवाल केले. लालूंनी त्या प्रतिक्रियेतून कॉंग्रेसची बिहारमध्ये ताकद नसल्याकडे लक्ष वेधल्याचे मानले जात आहे.