आळंदी, दि. 1 (एम.डी.पाखरे/ ज्ञानेश्वर फड ) – आळंदीची कार्तिकी वारी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गेली दोन वर्षे करोना साथीच्या आजारामुळे आळंदी कार्तिकी वारीसह राज्यभरातील सर्व सोहळे प्रातिनिधीक स्वरूपात पार पडले होते. मात्र यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असून सर्व सोहळे, उत्सव निर्बंधमुक्त साजरे होत आहे. जुलै महिन्यात झालेली आषाढी वारी निर्बंध मुक्त झाली होती. यावेळी 12 लाखांपेक्षा अधिक भाविक वारी सोहळ्यासाठी पंढरपूरात दाखल झाले होते. आता पंढरपूर आणि आळंदीची कार्तिकी यात्रा देखील निर्बंध मुक्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर अलंकापूरीत कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून 5 लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे.
कार्तिक वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधी मंदिरात प्रतिपदा बुधवार (दि. 9) पासून सप्ताहाला सुरुवात होणार आहे. तर बुधवारी (दि. 16) संत नामदेव महाराज तर गुरुवारी (दि. 17) श्री पांडूरंगराय यांचा पालखी सोहळा आळंदीत दाखल होईल. कार्तिक वद्य अष्टमी गुरुवार (दि. 17) सकाळी 9 वाजता श्री गुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने समाधी सोहळ्यास सुरुवात होईल. रविवारी (दि.20) कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) असून मंगळवारी (दि. 22) संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726 वा संजिवन समाधी सोहळा पार पडणार आहे. समाधी सोहळ्यानिमित्त सकाळी 10 ते 12 कीर्तन होईल आणि नंतर गुलाल व पुष्पवृष्टी करण्यात येईल. तर बुधवारी (दि.23) अमावस्येला समाधी सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती आळंदी देवस्थानकडून देण्यात आली आहे. या सोहळ्याची देवस्थानची तयारी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वारीनिमित्त दुरुस्ती-देखभाल तयारीला वेग
दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त सोहळा होणार असल्यामुळे लाखो भाविक अलंकापूरीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदी प्रशासनाने भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सोयी-सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली असून त्यांना वेग आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. तसेच वारकऱ्यांच्या सुविधेच्या दृष्टीकोनातून वीज, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कामे सुरु आहेत. तसेच येत्या तीन-चार दिवसांत प्रांत अधिकारी, मंदिर समिती, पोलिस प्रशासन, आळंदी प्रशासन यांची संयुक्त बैठक होण्याची शक्यता असून यामध्ये आगामी कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी उपाययोजनांसंदर्भात चर्चा होणार आहे.