नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज दिली आहे.कारण सरकारने 1 जुलै 2021 पासून पूर्ण महागाई भत्ता दिला जाणार आहे. सोबतच चालू वर्षीचा जो तीन वेळचा महागाई भत्ता थकलेला आहे तो देखील मिळणार आहे.अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत याची माहिती दिली. त्यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा थकलेला महागाई भत्ता जुलै 2021 मध्ये दिला जाणार आहे. कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 असे तीन हप्ते रोखले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा केंद्राच्या 50 लाख कर्मचाऱ्यांबरोबर 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
राज्यसभेत एका लिखित उत्तरात अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, जेव्हा भविष्यात 1 जुलै 2021 च्या महागाई भत्त्यासाठी निर्णय घेतला जाईल तेव्हा थकलेल्या तीन वेळच्या भत्ताही दिला जाणार आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, तीन वेळचा महागाई भत्ता रोखल्याने सरकारचे जवळपास 37,530.08 रुपये वाचले होते. यामुळे कोरोनाकाळातील आर्थिक संकटाचा सामना करण्यास मदत मिळाली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढही केली जाते. सध्याचा भत्ता हा जुलै 2019 पासून लागू आहे. यामध्ये जानेवारी 2020 मध्ये वाढ करण्यात येणार होती. हा भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 21 टक्के करण्यास मंजुरीदेखील मिळाली होती. परंतू अद्याप तो लागू करण्यात आलेला नाही.